वेल्हे – सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये मोठ्या दिमाखात उभी असलेली स्वराज्याची प्रथम राजधानी, स्वराज्याच्या सुख दुःखाचा मुख्य साक्षीदार म्हणजे किल्ले राजगड. गड चढताना जिथे नराचा वानर होतो. तो गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजे किल्ले राजगड. कोरोना काळातील सर्व निर्बंध शिथिल होत असताना ऐतिहासिक सहलीसाठी देश विदेशातील पर्यटकांचे आवडीचे ठिकाण ठरत असून पर्यटनासाठी किल्ले राजगड कधी सज्ज होणार या प्रतिक्षेत इतिहासप्रेमी व पर्यटक आहेत.
पुण्यापासून जेमतेम ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी पुणे नसरापूर व पुणे (पानशेत) पाबे घाट मार्गे गडावर जाता येते. परिसरात आल्यानंतर गुंजवणे गावाकडून गुप्त दरवाजा व गुंजवणे दरवाजा, पालिमार्गे मुख्य दरवाजा व भुतोंडे मार्गे आळू दरवाजा आशा तीन चार मुख्य दरवाज्यातून गडावर प्रवेश करता येतो. नदिनाल्यांचा खळखळाट आणि घनदाट जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाट आपले स्वागत करण्यासाठी सज्ज असतात.
निसर्गाचे अनेक चमत्कार पहात गडचढताना भूतलावरील खऱ्या खुऱ्या स्वर्ग दर्शनाची आठवण होते. डोक्यावर आलेले दुधाळ ढग अंगावर शहारे निर्माण करतात तर किर्र जंगलातून जाताना विविध वनऔषधींचा शरीराला होणारा स्पर्श सुखद अनुभव देतो. छोट्या मोठया जीवांच्या आवाजाने मन प्रसन्न होऊन जाते आणि उर्जा येते ती फक्त आणि फक्त राजगड चढण्याची व त्याची कणखरता पारखण्याची.
गडावर जाण्यासाठी पुणे येथून स्वारगेट वरून गुंजवणे, वाजेघर, भुतोंडे या बस व खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या जीप गाड्या गडाच्या पायथ्यापर्यंत जातात. तर वेल्हे, केळद, पासली किंवा मार्गासनी पर्यंत पी एम टी बसने गेल्यास राजगड पायथा गुंजवणे व पाली येथे जाता येते. कितीही उशीर झाला तरी गडाच्या पायथ्याला राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. पुणे सातारा रोडवर चेलाडी (नसरापूर ) या ठिकाणी उतरल्यास राजगड कडे जाणाऱ्या गाड्या मिळतात.
पद्मावती, सुवेळा, संजीवनी आशा तीन माच्या व बालेकिल्ला असे चार विभाग गडावर आहेत. राजगड नावाच्या अगोदर या किल्ल्यास ब्राह्मगिरीचा डोंगर, मुरूम देवाचा डोंगर, शहांब्रूक पर्वत, नबीशहा गड अशा अनेक नावांनी ओळखले जायचे. ऐतिहासिक पर्यटन म्हंटले कि अनेकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो किल्ले राजगड.
पावसाळा व हिवाळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या साठ ते सत्तर हजाराच्या आसपास असून सर्वाधिक पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैद्राबाद, बेंगलोर, सुरत व विदेश्यातील पर्यटक अभ्यासासाठी आणि ट्रेकिंगसाठी येथे येतात. १३५० मीटर उंचीवर असलेला हा किल्ला चढण्यास आवघड आहे. घसरड्या व अरुंद वाटा, शेवाळलेले दगड, उंच चढण यातून मार्ग काढत जावे लागते. जाताना बरोबर पाणी असणे गरजेचे आहे.
गडावर जाण्यासाठी पायथ्याला पाहिजे असल्यास माहितगार माणसे मिळतात. गडावर जेवणाची व्यवस्था केली जाते. गडावर जाताना आपण आल्याची नोंद वनविभागाच्या कार्यालायत करावी. गाडी पार्किंग धारकाच्या ताब्यात द्यावी. मध पोळ्याला दगड मारू नये, जाताना येताना कचरा करू नये, स्थानिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक आहे. नशापाणी करून गड चढू नये अपघात होऊ शकतो.
राजगड हा पिकनिक पॉईंट नाही. राजगडावर येणारे पर्यटक हे अभ्यासू आहेत ते काहीतरी चांगला संदेश घेऊन जातानाच शिवकालीन गोष्टींचा अभ्यास करतात. त्यासाठी ते वारंवार येत असतात. मात्र पाच दहा टक्के उपद्रवी आपली हजेरी लावून जातात. अनेकांशी वाद होतात. अगदी पोलीस स्टेशन पर्यंत जावे लागते. असे स्थानिक ग्रामस्थ व वेल्हे तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ यांनी सांगितले.