रुग्ण आणि नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय प्रश्न
खासगी रुग्णालय आणि डॉक्टरांकडून रुग्णसेवा नाकारल्याच्या घटना समोर
पुणे – हार्ट ऍटॅक आलेल्या एका रुग्णाला दाखल करून न घेता त्याला अन्यत्र घेऊन जाण्यास सांगण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. यासंदर्भात संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. खासगी रुग्णालयांनी आणि डॉक्टरांनी रुग्णसेवा नाकारू नये, मनमानी करू नये, लोकांवर उपचार करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात असतानाही हा प्रकार घडला असल्यामुळे संतापाची भावना निर्माण झाली आहे.
साधारण अठरा दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. एका 52 वर्षीय रुग्णाला त्रास होऊ लागल्यामुळे त्याला एका इस्पितळात नेण्यात आले. मात्र, त्यावर उपचार करण्यास नकार दर्शवत त्याच्या तोंडावर दार बंद करण्यात आले.
त्यानंतर हा रुग्ण आपल्या पत्नीसमवेत घरी गेला. मात्र, त्रास असह्य होत असल्यामुळे त्यांनी पुन्हा एका रुग्णालयाचे दार ठोठावले. येथेही त्यांना नकारघंटाच ऐकविण्यात आली. दिवसभरात त्या रुग्णाची व त्याच्या पत्नीची गंभीर स्थितीत धावपळ सुरू होती. एका खासगी रुग्णालयाने त्यांना मदत केली, मात्र तेही त्यांच्याकडे दाखल करून न घेता अन्यत्र पाठविण्याची. त्याकरता त्यांनी रुग्णाकडून ऍम्बुलन्सचे भाडे आणि इतर सामग्रीची रोख रक्कम मोजून घेतली. पालिकेच्या दोन रुग्णालयांसह तब्बल सहा रुग्णालयांची दारे अयशस्वीपणे ठोठावल्यानंतर त्या रुग्णाला अखेर जगाचा निरोप घ्यावा लागला. सध्याच्या करोना महात्म्यात या प्रकरणाची फारशी चर्चा झाली नाही. मात्र, खासगी रुग्णालयांना आणि डॉक्टरांना योग्य ते निर्देश दिले जातील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र, इतके दिवस उलटून गेल्यानंतरही त्यात काडीचाही फरक पडला नसल्याचे कालच्या घटनेनंतर अधोरेखित होत आहे.
एका वाचकानेही काही दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेली घटना दैनिक “प्रभात’ला कळवली. रुग्णाला त्रास होत असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला एका खासगी इस्पितळात नेले. मात्र, रुग्ण दाखल करून घेणे तर दूरच, दारातूनच परत पाठवले जात होते. नायडूत जा, ससूनला न्या, अशा स्वरूपाची उत्तरे दिली गेली. एका रुग्णालयात रुग्णाला आत घेण्याचे सौजन्य दाखविण्यात आले. त्यानंतर पुढचे उपचार सुरू केले. त्या रुग्णाचा एक्स-रे काढण्यात आला. त्यानंतर ज्याची भीती होती, तेच झाले.
रुग्णाला नायडूला घेऊन जाण्यास सांगण्यात आले. नायडूला नेल्यावर जागा नाही, असे सांगत ससूनला त्या रुग्णाची पाठवणी करण्यात आली. ससूनला त्या एक्सरेची पाहणी केल्यानंतर औंध येथील एका ठिकाणी नेण्यास सांगण्यात आले. सुदैवाने त्या रुग्णाचे प्राण वाचले. मात्र, सगळेच असे नशीबवान असतीलच असे नाही.
डॉक्टरांना देवाचा अवतार मानले जाण्याची आपल्या देशात परंपरा आहे व तशी श्रद्धाही अनेक प्रसंगांतून दिसून येते. मात्र, ज्या काही बातम्या आणि माहिती माध्यम म्हणून आमच्याकडे येतात, त्या सगळ्या वरील लौकिकाला छेद देणाऱ्याच आहेत.
आता तर रुग्णांकडून अवास्तव बिल आकारणी केल्याचे प्रकारही समोर आले असून कालच एका इस्पितळाला नोटीस बजावण्यात आली आहे. अन्य एका हॉस्पिटललाही तंबी देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. डॉक्टर असो अथवा खासगी हॉस्पिटल यांनी आपण सध्या कोणत्या परिस्थितीत आहोत, यावेळी आपले हे आचरण योग्य आहे का, काही चुका जर झाल्या असतील तर त्या आता पुन्हा होणार नाही याची दक्षता घेता येईल का, याचा विचार करण्याची गरज आहे.
हे प्रश्न स्वत:ला अवश्य विचारा :
– केवळ करोना आल्यामुळे सगळी मानवजात ठणठणीत झाली आहे. लोकांना आता करोनाशिवाय इतर कोणतेही त्रास होत नसतील असा डॉक्टरांचा आणि हॉस्पिटल्सचा समज झाला आहे का?
– वैद्यकीय पेशा हा पवित्र पेशा मानला जातो. सेवाभावी वृत्ती त्यात अभिप्रेतच असते. मात्र काही मूठभर लोकांमुळे एकूणच सर्व रूग्णालये आणि डॉक्टरांना संशयाच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य आहे का?
– ज्या डॉक्टरांकडून अथवा संस्थांकडून चुका होत असतील त्यांना त्यांचे इतर सहकारी उपचाराचे डोस पाजू शकत नाहीत का?
– प्रशासनाने माध्यमांसमोर दोन वाक्य बोलून वेळ मारून नेण्यापेक्षा काही ठोस कारवाई करण्याचे नियोजन का केले नाही?