मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. दरम्यान, त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळ्या चर्चाना उधाण आले होते. दरम्यान, या भेटीमागचे तर्कवितर्क आणि आडाखे लावले असतानाच या भेटीमागे काय कारण होते ते समोर आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: फडणवीस भेटीमागील कारण स्पष्टपणे सांगितलं होते तर आता या बैठकीवर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
Sanjay Raut ji wanted to take my interview for Shiv Sena’s newspaper Saamana. The meeting was held to discuss the same as I had put certain conditions, I wanted it to be published unedited. No political talks held in meeting: Devendra Fadnavis, Former Maharashtra CM & BJP leader https://t.co/AuRcCtSOXU pic.twitter.com/2BabKfCXAU
— ANI (@ANI) September 27, 2020
दरम्यान,वृत्तमाध्यमांशी बोलत असताना फडणवीस यांनी राऊत यांच्या भेटीबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबद्दल स्पष्ट भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले,’संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेणार हे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांचा फोन आला होता. त्यामुळे मी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे चर्चा करण्यासाठी राऊत यांची भेट झाली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि कारणही नाही’, असं स्पष्ट खुलासा फडणवीस यांनी केला आहे.
युतीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले,’शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा केली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही, जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू पण सरकार बनवण्याची कोणतीही घाई भाजपला नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.’