भाऊसाहेब भोईर यांची एकनाथ पवारांवर टीका
पिंपरी – अण्णासाहेब मगर यांनी उद्योगनगरी वसविली नसती तर मराठवाड्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवित बसला असता, अशा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी सत्ताधारी पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर महापालिका सभागृहात टीका केली.
महापालिकेच्या सर्वासधारण सभेत शहरातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्था या विषयावर चर्चा सुरू असताना भोईर यांनी ही टीका केली. महापालिकेची बुधवारी झालेली सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. या वेळी मयत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर शहरातील प्रश्न आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल चर्चा सुरू होती. सातत्याने तहकूब करण्यात येत असलेली सर्वसाधारण सभा, शहरातील कचऱ्याचा प्रश्न, महापालिकेतील अनागोंदी या विषयावर नगरसेवकांच्या भावना तीव्र आहेत. सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान भोईर यांनी ही टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड सारख्या छोट्या शहराची उद्योगनगरी म्हणून अण्णासाहेब मगर यांनी निर्मिती केली. त्यांच्या आदर्श विचाराने शहराची निर्मिती झाली आहे. “साधी राहणी, उच्च विचार’ जपणारे हे लोक होते. शहरातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होणे गरजेचे आहे. सत्तेचा वापर समस्या सोडविण्यासाठी करा, असेही भोईर म्हणाले.
यावेळी भोईर यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांच्या आठवणी सांगितल्या. तर दिक्षीत यांच्या निधनाबद्दल शोकही व्यक्त केला.