मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता आता मात्र, करोना रुग्णसंख्या मागील आठवड्यापासून हळूहळू कमी होत आहे. त्यातच आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. यासोबत कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना प्रशासनाकडून कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा देखील वेग वाढवण्यात आला आहे.
महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे.#MahaVaccination
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 27, 2021
काही दिवसांपूर्वी करोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. करोनाविरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ज्ञ डॉक्टर्स यांना केले होते. यांनतर मार्च महिन्यात कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक होती. तर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की,’राज्यात दीड कोटी लसी देण्याचा टप्पा पार केला आहे. इतक्या विक्रमी संख्येमध्ये लसीकरण करणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी ट्विट केले आहे की, ‘महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे.’
दरम्यान, भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस उपलब्ध असून येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा लसीकरणाचा तिसरा टप्पा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार सर्व राज्यांमध्ये लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात लसीचा पुरेसा साठा आणि लसीची किंमत या दोन मुद्द्यांवर चर्चा सुरू असून इतक्या मोठ्या प्रमाणात लसींचा साठा कसा उपलब्ध होणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यासोबतच, लसींची किंमत देखील अदर पूनावाला आणि भारत बायोटेकने वाढवली असल्यामुळे राज्यात मोफत लसीकरण करता येईल का? यावर चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.