विद्यापीठ अनुदान आयोगाचा परीक्षा घेण्यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला होता. या निर्णयानंतर राज्य सरकारतर्फे परीक्षा घेण्यासंदर्भातील हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर संवाद साधताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण -मंत्री उदय सामंत यांनी, परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील अशी माहिती दिली आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले…
‘अशी’ असेल परीक्षा
परीक्षा शक्यतो ऑनलाईन घेण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांवर दबाव येऊ नये यासाठी कमी गुणांची परीक्षा असेल, अशीही माहिती दिली.
मुदतवाढीसाठी अनेक कुलगुरू आग्रही
“युजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. युजीसीने ही मागणी मान्य करावी यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा आणि तशी विनंती यूजीसीकडे करावी अशी सूचना कऱण्यात आली आहे”.
मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा
“मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन बुधवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर कुलगुरुंनी केलेल्या विनंतीप्रमाणे मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत,”
विद्यार्थ्यांना पूर्वतयारीसाठी वेळ देणार
“परीक्षा नेमकी कधी सुरु होईल अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की, आज परीक्षा जाहीर केली आणि उद्या घेतली असं होणार नाही. पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्याासासाठी दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. निकाल काही विद्यापीठ ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील. तर काही विद्यापीठ १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील,”
परीक्षेसाठी केंद्रावर जावे लागू नये यासाठी प्रयत्न
“विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार नाही यासंबंधी कुलगुरुंकडे विनंती करण्यात आली असून त्यावरही चर्चा झाली. विद्यार्थ्यांना शारिरीक आणि मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे अशी पुन्हा विनंती कऱण्यात आली. त्यानुसार पेडणेकर समिती चांगल्या पद्धतीनं काम करत असून कार्यवाही करत आहे,”
घरातूनच परीक्षेबाबत कुलगुरूंच्या एकमत
“विद्यार्थी घराबाहेर पडणार नाही, घरातच परीक्षा देता आली पाहिजे यावर कुलगुरुंच एकमत झालं आहे. ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची करोना संकटात परीक्षा घेणं फार जिकीरीचं काम आहे. मात्र कुलगुरु हे योग्य पद्धतीने पार पडेल याबद्दल आशा आहे,” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाने परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं स्पष्ट केलं आहे. तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असं स्पष्ट केलं होतं.