राजू शेट्टी यांचा सवाल; अर्थतज्ज्ञ तोंड मिटून गप्प
पाटण – देशाच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन शेतकरी आपल्या शेतात पिकवितो. तरीही दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशाचा विकास झाला मात्र, शेतकरी कंगाल झाला आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांच्या अज्ञाताचा फायदा घेत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच कधी? असा सवाल करून कष्ट करणारा माणूस शेतकरी हाच आहे. बाकीचे सर्व अर्थव्यवस्थेला लागलेली बांडगुळं आहेत. शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट होत असताना अर्थतज्ज्ञ तोंड मिटून गप्प का आहेत? असा सवाल माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
येथील भडकबाबा साहित्य नगरीत आयोजित ग्रंथ महोत्सव आणि साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शेती व शेतीचे अर्थकारण या विषयावर ते बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, तालुकाध्यक्ष विकास हादवे, शाहीर शीतल साठे, सचिन माळी उपस्थित होते.
माजी खा. राजू शेट्टी म्हणाले, पाटण तालुक्यात कधी येण्याचा योग आला नाही व त्यांनीही कधी बोलवले नाही. त्यामुळे मलाही असं वाटलं की, इथंल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेले आहेत. सातारा जिल्हा हा लढाऊ जिल्हा आहे. पाटणला आलो नाही याचं मनामध्ये शल्य होतं, कुणकुण होती. मात्र हा योगायोग आज आला असे सांगून ते म्हणाले, ज्यांना घाम येतो त्यांना कष्टकरी म्हटलं पाहिजे. ज्यांना घामाची चवच माहिती नाही त्यांना काय शेतकऱ्यांच्या व्यथा कळणार?
मराठी साहित्यात शेतकऱ्यांचे चित्र हे अत्यंत किव येणारे, रंगवलेलं असतं. उपलब्ध जमिनीत काबाडकष्ट करुनदेखील शेतकरी आज सुखी, समाधानी नाही. केंद्र शासन कायद्याची चौकट करुन एकप्रकारे शेतकऱ्यांची लूट करत आहे. आजचा अर्थसंकल्प हा धादांत खोटा असून चुकीची आकडेवारी दिली गेली आहे. व्यवस्थेच्या विरोधात जर शेतकऱ्यांनी बंड केले तर काय होईल. शेतकऱ्यांच्या असाह्यतेचा फायदा घेतला जात आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या पोरांनींच याविरोधात बंड केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. संमेलन अध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि दशा मांडल्या. सोमनाथ आग्रे यांनी सूत्रसंचालन केले. विशाल देसाई यांनी आभार मानले.