करोना काळात अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांची तुलना केल्यास सर्वात जास्त फटका पर्यटन क्षेत्राला बसला आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री जी. के. रेड्डी यांनी 2024 च्या मध्यात पर्यटनाची स्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षावजा आशावाद व्यक्त केला आहे. तसेच 2030 पर्यंत दरडोई उत्पन्नात पर्यटनाचा हिस्सा 250 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा आकडा 2047 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
अलीकडेच हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पर्यटन संमेलनात जवळपास सर्वच राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांनी सहभाग घेतला. या संमेलनादरम्यान एक घोषणापत्र जारी करण्यात आले असून त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्यातून व समन्वयातून पर्यटन उद्योगाचा विस्तृत विस्तार करण्याचा संकल्प केला आहे.
आजघडीला वातावरण बदलामुळे पर्यटनाच्या क्षेत्रातही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या अडचणी बघता सरकारणे ठेवलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करून पर्यटन उद्योगाचा अधिकाधिक विस्तार कसा होण्यार यावर भर दिला जाणार आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्या आणि महाकाय क्षेत्रफळ असलेल्या देशात स्थानिक पर्यटनावर काही मर्यादा येतात. प्रसिद्ध ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे वगळता अशी अनेक प्रसिद्धीस न पावलेली ठिकाणे आहेत, ज्यांना राष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पर्यटन धोरण याबाबत मैलाचा दगड ठरू शकते. शासनाच्या उद्दिष्टांनुसार पर्यटन उद्योगात सक्रिय असलेल्या इतर सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगांसुद्धा सरकारचे सहकार्य मिळणार आहेत. तसेच या उद्योगातील रोजगाराची क्षमतासुद्धा वाढवली जाणार आहे.
जर आपण आपल्या पर्यटन नकाशामध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या स्थळांना स्थान दिले तर, त्याचा आर्थिक लाभ तर होईल त्याचबरोबर लोकांना देशातील विविधतेचा अनुभव घेता येईल. पुढच्या वर्षी जी-20 या संघटनेच्या शिखर परिषदेचे आयोजन भारतात होणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय जागतिक स्तरावर वृद्धिंगत करण्यासाठी भारताला ही एक चांगली संधी चालून आलेली आहे. या माध्यमातून भारतास एक प्रमुख पर्यटन देश म्हणून जगापुढे आणता येईल.
विशेष म्हणजे भारताला फार पूर्वीपासून जागतिक प्रतिष्ठा लाभलेली आहे. जगभरात भारत एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्रेक्षणीय स्थळांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भारतात जगाच्या विविध भागातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मात्र, व्हिसासंदर्भातील नियमांत सुकरता आणणे आणि परदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य चांगले व्हावे यासाठी साधनसुविधांची उपलब्धता संख्यात्मक आणि गुणवत्तामकदृष्ट्या वाढवणे गरजेचे आहे.
जर निश्चित केलेल्या घोषणेनुसार लक्ष्य पूर्ण केले गेले तर, 2024 च्या मध्यापर्यंत जीडीपीमध्ये म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नात एकट्या पर्यटनाचा हिस्सा 150 अब्ज डॉलर असण्याची शक्यता आहे. पर्यटन विकासातून तब्बल 30 अब्ज डॉलर्सपर्यंतचे विदेशी चलन भारताला मिळू शकते. निर्धारित कालावधीत आपल्या देशात किमान 1.5 कोटी विदेशी पर्यटक पर्यटनासाठी येतील.