वायसीएम रुग्णालयातील परिस्थिती : जन्मदात्यांना बेवारस सोडून पोटची पोरं गायब
– प्रकाश गायकर
पिंपरी, दि. 29 – आज सोशल मीडिया आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ येत आहे. परंतु रक्ताची नातीच दुरावताना दिसत आहेत, आणि तीही अशावेळेस जेव्हा सर्वाधिक गरज असते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील काही रुग्णांकडे पाहिल्यास दिसून येते की आज माणूस जन्मदात्या आई-बापाला मरण्यासाठी सोडून देत आहेत. ज्या आई-बापाने हे जग दाखवले त्यांनाच रुग्णालयात बेवारस अवस्थेत सोडून पोटची पोरं घरची वाट धरत आहेत.
पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रोज अशा बेवारस रुग्णांना दाखल केले जाते. ज्यांना आई, वडील, भाऊ, बहीण आहेत, मात्र त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांमध्ये रुग्णालयात तब्बत 120 बेवारस रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यातील बऱ्याच रुग्णांची अर्थिक परिस्थिती नाही. अनेक रुग्णांचे वय जास्त झाल्याने त्यांना हालचाल करता येत नाही. अशा रुग्णांना सांभाळण्यासाठी नातेवाईक तयार होत नाही.
अशाप्रकारे सधन कुटुंबातील व्यक्तीही आपल्या आई-वडीलांना वाऱ्यावर सोडत आहे. थकलेल्या आई-वडीलांना सांभाळण्यासाठी वेळ मिळत नाही. ते घरामध्ये घाण करतात, स्वच्छता ठेवत नाही. त्यांच्यामुळे आमच्या मुलांवर वाईट परिणाम होतात, अशा तक्रारी हे कुटुंबिय करतात. मात्र आज त्यांच्यामुळेच आपण हे जग पाहत आहोत हे ते विसरून जातात.
तीन महिन्यांनी सापडली दोन मुले
17 सप्टेंबर या दिवशी एका वृद्ध महिलेला रुग्णालयात तिच्या दोन मुलांनी दाखल केले. त्यानंतर दोनही मुलांनी तेथून पळ काढला. त्या दोन मुलांना शोधण्यात तीन महिन्यांने यश आले. त्याबाबतची हकीगत अशी की, वृद्ध महिलेला अचानक सांधेदुखीचा त्रास होऊ लागला. तिच्या दोन्ही मुलांनी स्वतःच्या चारचाकी वाहनांमधून आईला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. सकाळी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरु केले. दोन्ही मुलांनी डॉक्टरांना तुमच्या पद्धतीने उपचार करा, असे सांगितले. दुपारी एका मुलाने व सुनेने तू आमच्या घरी परत येऊ नको, असा त्या माऊलीला दम दिला. त्यानंतर दोघेही रुग्णालयातून निघून गेले. सायंकाळच्या वेळेस दुसरा मुलगा आई मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो असे म्हणून निघून गेला, तो परतलाच नाही. तीन महिने झाल्यावरही या वृद्ध आईकडे एकाही मुलांने डोकावले नाही. त्या दोनही मुलांना शोधण्यासाठी रुग्णालय प्रशासन, रिअल लाइफ रिअल पिपल संस्था आणि पोलिसांनी प्रयत्न केले. अखेर त्या मुलांना शोधून त्या वृद्ध आईला त्यांच्याकडे सूपुर्द करण्यात आले.
अकरा महिन्यांत 22 जणांवर अंत्यसंस्कार
वायसीएम रुग्णालयातील रिअल लाइफ रिअल पिपल ही संस्था या बेवारस रुग्णांची जबाबदारी घेते. त्यांना जेवण देऊन त्यांची देखभाल केली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांना शोधण्यासाठी ही संस्था कसोशीने प्रयत्न करते. नातेवाईक न सापडलेल्या रुग्णांना आश्रमात पाठविण्याची जबाबदारी संस्था घेते. तसेच उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर संस्थेमार्फत अंत्यसंस्कार केले जातात. आतापर्यंत अकरा महिन्यांमध्ये 22 अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये संस्थेचे संस्थापक एम ए हुसैन, समाजसेवक महादेव बोत्रे, कुंडलिक महाले, उल्हास चांगण, रेणुका शिंदे, आकाश शिरसाठ, मिलिंद माळी, दत्ता वाघमारे हे काम करतात.
संस्थेच्या माध्यमातून जे काम केले जात आहे ते कौतुकास्पद आहे. रुग्णालय प्रशासनाचा नेहमीच संस्थेला पाठिंबा आहे. नातेवाईकांकडून अतिशय वाईट वागणूक दिलेल्या रुग्णांना संस्थेकडून माणुसकीची वागणूक दिली जाते. अनेक नातेवाईक अर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णांना सोडून जातात. कारण त्यांना आधाराची व आश्रयाची आवश्यकता असते. मात्र यामुळे रुग्णालय प्रशासनावर ताण येतो.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय.
धावपळीच्या युगामध्ये लोक स्वतःचे कर्तव्य विसरले आहेत. शेकडो बेवारस रुग्णांना दरवर्षी दाखल केले जाते. अनेक रुग्णांना स्वतःच्या घरच्यांनीच सोडून दिलेले असते. अशा रुग्णांवर उपचार केले जातात. अशाप्रकारे रुग्णांना सोडून पळ काढणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे आवश्यक आहे.
– एम. ए. हुसैन, संस्थापक, रिअल लाइफ रिअल पिपल.