अर्शद आ शेख
श्रीगोंदा – आमदार आलेत तुम्हाला भेटायला, हे जेव्हा कार्यकर्त्यांनी एका मेंढपाळाला सांगितले. तेव्हा तो उत्तरला, आमदार माणूस असतो का? 1980 ला खटकेवाडी (ता. श्रीगोंदा) येथे घडलेला वरील प्रसंग तेव्हा सर्वदूर चर्चिला तर गेलाच, शिवाय तळागाळातल्या लोकांचे राजकीय व्यवस्थेविषयी असणारे अज्ञान व अलिप्ततावाद देखील सांगून गेला.
30 मे 1980 ला विधानसभा पार पडली. 1 जून रोजी निकाल लागला. बबनराव पाचपुते अनपेक्षितरीत्या आमदारपदी निवडून आले. दोन जूनला आमदारांचा तालुक्यात आभार दौरा सुरू झाला. सोबत दोन दुचाकी होत्या. शिवाजी मोरे, ज्ञानदेव राऊत, प्रा. तुकाराम दरेकर आदी निवडक मंडळी सोबत होती. कोसेगव्हाण भेटीनंतर खटकेवाडीला ते गेले. तेथे जंगलात काही मेंढपाळ शेळ्या राखत होते. पाचपुते व सोबतची मंडळी तेथे पोहोचली. आम्ही आभार मानायला आलोय, हे दरेकर यांनी सांगितले.
आभार कशाचे? असे मेंढपाळांनी विचारल्यावर पाचपुते यांच्याकडे बोट दाखवत हे आमदार झाले, त्याबद्दल आभार मानायला आलोय, असे दरेकर म्हणाले. थोडा वेळ मेंढपाळ स्तब्ध झाला. चहूबाजूने निरखून पाहू लागला, अन मग उत्तरला आमदार माणूस असतो? त्याच्या प्रश्नाने सर्वांना धक्काच बसला. त्याने आजवर आमदार शब्द अनेकदा ऐकला होता. पण आमदार कसा असतो हे बघितलं नव्हतं. म्हणून हा शंकेखोर प्रश्न त्याने विचारला.
ग्रामीण भागातील जनता व खेड्यापाड्यातील मेंढपाळ ते गुराखी राजकीय हालचाली व व्यवस्थेपासून किती लांब होती, याचे हे जळजळीत उदाहरण म्हटले पाहिजे. 1980 ते आज 2019 पर्यंत झालेली सामाजिक जागृती व राजकीय जिज्ञासा किती अफाट आहे, हे वेगळे सांगायला नको. तालुक्यातील छोटा पुढारी म्हणून सर्वदूर ओळख पावलेला घनश्याम दरोडे याला या जागृत समाजाचे प्रतिबिंब म्हणायला हवे.
एका खेड्यातील हा बारीकराव मोठ्या नेत्या देखत राजकीय फटकेबाजी करतो हा या चार दशकातील बदल म्हणावा लागेल. 1980 पूर्वी शिवाजीराव नागवडे फक्त 28 महिने आमदार होते. त्याआधी दीर्घकाळ भारस्कर पदावर होते. मतदारसंघ खुला झाल्यावर जनतेत राजकीय उत्सुकता व सक्रियता वाढत गेली. आमदार माणूस असतो का ? असा प्रश्न विचारणारा मतदार या तालुक्यात होता. हे अनेकांना आज खरे वाटणार नाही.
बूट पॉलिश करणारा आमदारकीच्या शर्यतीत
चालू निवडणुकीतील उमेदवारांपैकी सुनील शिवाजी उदमले या तरुणाला आमदार व्हायचे आहे. पूर्वी तो बसस्थानकाबाहेर बूट पॉलिश व चप्पल शिवायचे काम करीत असे. आता त्याची छोटी टपरी आहे. पदवीधर असणारा हा तरुण आमदारकीच्या लढतीत उतरला आहे. त्याची पार्श्वभूमी कष्टकरी व उपेक्षित वर्गाची आहे. चाळीस वर्षांत बदलत्या सामाजिक परिवर्तनाचा तो प्रतीक म्हणावा लागेल.