नवी दिल्ली – काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी शनिवारी स्वतःच्या ट्विटमुळे वादात सापडले. मात्र, त्यांनी हे ट्विट डिलीट केले आणि नव्या पोस्टसह स्पष्टीकरण दिले. पण अधीर यांची सारवासारव देखील अपुरी पडत असून लोक त्यांना ट्रोल करत आहेत. अधीर हे पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही आहेत.
आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त अधीर रंजन यांनी त्यांची आठवण करून एक ट्विट केले. ग्राफिक्ससह लिहिले होते – ‘जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा पृथ्वी हादरते’. राजीव गांधी यांनी आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हे विधान केले होते.
राजीव म्हणाले होते की, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारतातील लोकांमध्ये एवढा राग आला आणि काही दिवस लोकांना भारत हादरत असल्याचे जाणवले. एखादे मोठे झाड पडले की पृथ्वी हादरते. राजीव यांचे हे विधान 1984 च्या शीख विरोधी दंगलीशी जोडले गेले होते.
हे ट्विट अधीर रंजन यांनी काही वेळातच काढून टाकले. त्यानंतर नव्याने ट्विट केलं. त्यात त्यांनी राजीव गांधी यांच्या विकासाच्या धोरणाबाबतच विधान शेअर केलं. अधीरने स्पष्टीकरण देत म्हटलं की, आधी माझ्या नावाने केलेल्या ट्विटशी माझा काहीही संबंध नाही. विरोधकांकडून माझ्याविरोधात अपप्रचार केला जात आहे.