नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये किमान आधारभूत किमतीला गव्हाची खरेदी केली जातेय.
4 जून 2021 पर्यंत किमान आधारभूत किमतीला 413.91 लाख मेट्रिक टन गहू शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. तर, 45 लाख 06 हजार शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आलीय. शेतकऱ्यांना 81,747.81 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या गव्हाची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर किमान आधारभूत किंमतीला गहू खरेदी करण्यात आला. मात्र, यावेळी एक राष्ट्र, एक एमएसपी आणि एक डीबीटी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होत आहेत.
धान उत्पादक शेतकऱ्यांकडून 4 जूनपर्यंत पर्यंत 805.21 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये खरिप हंगामातील 706.93 लाख मेट्रीक टन तर रब्बी हंगामातील 98.28 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आलीय. किमान आधारभूत किमतीला 119.42 लाख शेतकऱ्यांकडून 1 लाख 52 हजार 022 कोटी रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे.
सन 2020-21 च्या खरिप हंगामात उत्पादित झालेल्या डाळींची देखील विक्रमी खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे करण्यात आलीय. मूग, उडीद, तूर, चना, मसूर, भुईमूग,सोयाबीन इत्यादी डाळींची 7 लाख 51 हजार 279 मेट्रीक टन खरेदी करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थान मधील 4 लाख 43 हजार 928 शेतकऱ्यांकडून 3 हजार 928.39 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे.