नवी दिल्ली – जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रत्येक लिटरला दहा रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर तब्बल 14.55 टक्के इतका मोजला गेला आहे.
फेब्रुवारी महिन्यात या महागाईचा दर 13.11 टक्के इतका होता. तर गेल्या वर्षी मार्च महिन्यात या महागाईचा दर 7.89 टक्के होता. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने बरेच प्रयत्न करूनही गेल्या 12 महिन्यांपासून घाऊक किमतीवरील महागाईचा दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला शक्य तितक्या लवकर व्याजदरात वाढ करावी लागणार असल्याचे समजले जाते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे इतर सर्व वस्तूंच्या किंमतीत वेगाने वाढ होत आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ, बटाटे, दूध, अंडी, प्रोटीनयुक्त पदार्थ इत्यादीचा समावेश आहे. अन्नधान्याच्या महागाईचा दर आठ टक्क्यांवर गेला असून भाज्यांच्या महागाईचा दर 20 टक्के इतका आहे.
युद्ध सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यामुळे इतर धातूंच्या आणि वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे भारताबरोबरच इतर देशातही महागाई वेगाने वाढत असल्यामुळे जागतिक मंदी येण्याची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
22 मार्च पासून भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल बरोबरच स्वयंपाकाचा गॅस आणि विमानाच्या इंधनाच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात सामाजिक असंतोष निर्माण झाला आहे. मात्र जर दर वाढविले नाही तर चालू खात्यावरील तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती जास्त प्रमाणात वाढ होऊनही त्या प्रमाणात भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही.