नवी दिल्ली- गव्हाचे किमान आधारभूत मूल्य सरकारने बुधवारी क्विंटलमागे 85 रुपयांनी वाढवून प्रतिक्विंटल 1,925 रुपये केले. त्याच प्रमाणे कडधान्यांचे किमान आधारभूत मूल्य क्विंटलमागे 325 रुपयांपर्यंत वाढवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या (सीसीईए) बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांकडून सरकार ज्या दराने धान्य खरेदी करते तो दर म्हणजेच “एमएसपी’ आहे.
“शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने चालू वर्षासाठी रब्बी हंगामातील पिकांचा “एमएसपी’ वाढविला आहे.’ अशी माहिती माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. “सीसीईए’ने 2012-20 च्या रब्बी पिकासाठी गव्हाच्या “एमएसपी’मध्ये 85 रुपये प्रतिक्विंटल दरवाढीला मंजुरी दिली असून गतवर्षी 1,880 रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या 1,440 रुपयांवर असलेल्या बार्ली “एमएसपी’मध्येही प्रति क्विंटल 85 रुपयांची वाढ झाली आहे. हा दर आता 1,525 रुपये इतका झाला आहे. डाळींच्या लागवडीस चालना देण्यासाठी मसूरचे आधारभूत मूल्य गतवर्षीच्या 4,475 रुपये प्रतिक्विंटलवरून 525 रुपयांनी वाढवून 4,800 रुपये प्रतिक्विंटल केले गेले आहे. त्याचप्रमाणे हरभऱ्यासाठीचा “एमएसपी’ 255 रुपयांनी वाढवून 4,875 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे, तो गेल्या वर्षीच्या क्विंटलमागे 4,620 रुपये होता.
2019-20 साठी तेलबियांपैकी मोहरीचा “एमएसपी’ 225 रुपयांनी वाढवून 4,425 रुपये प्रतिक्विंटलवर झाला आहे, 2018-19 मध्ये हाच दर प्रति क्विंटल 4,200 रुपये देण्यात आला होता. सूर्यफुलासाठी किमान आधारभूत किंमत गेल्या वर्षीच्या क्विंटल 4,945 रुपये होती. ती 270 रुपयांनी वाढवून 5,215 रुपये प्रतिक्विंटल केली गेली आहे.
यावर्षी जाहीर झालेल्या रब्बी पिकांसाठीची “एमएसपी’ सरकारच्या शेतमालाच्या सल्लागार समिती “सीएसीपी’च्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. गहू हे रब्बीचे मुख्य पीक असून, गव्हाची पेरणी पुढील महिन्यात सुरू होईल. पुढील वर्षीच्या एप्रिलपासून पिकाची विक्री केली जाईल.