अल्पावधीत जगात लोकप्रिय झालेल्या आणि अनेकांना व्यसन जडलेल्या व्हॉट्सऍप या मेसेजिंग ऍपने आणलेल्या नवीन धोरणामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. या धोरणावर टीका होऊ लागल्यानंतर व्हॉट्सऍपने खुलासा दिला असून केवळ व्यावसायिक वापरकर्त्यांसाठीच हे धोरण लागू असल्याचे म्हटले आहे; परंतु फेसबुकचा इतिहास पाहता यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न पडतो. वास्तविक, यानिमित्ताने सर्वांनीच सोशल मीडिया, मेसेजिंग ऍप्स यांचा वापर किती करायचा, त्यावर अनावश्यक माहिती शेअर करत आपला अमूल्य वेळ घालवायचा का, याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
युजर्सची माहिती आपण नेमकी कोणत्या स्वरुपात साठवून ठेवणार आहोत, यासंदर्भात अलीकडेच व्हॉट्सऍप या कंपनीने केलेल्या खुलाशामुळे लोकांमध्ये काळजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात अनेकांकडून टीकेचा भडीमार केला गेला. काहींनी थेट व्हॉट्सऍपऐवजी अन्य सोशल नेटवर्किंग ऍप्सचा वापर करावा अशी आग्रही मागणी करत मोहीमही उघडली. त्यानंतर व्हॉट्सऍपकडून एक खुलासा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, व्हॉट्सऍपच्या सर्वसामान्य ग्राहकांची नेहमीची संभाषणे, ग्रुपमधील चॅटिंग यावर नव्या धोरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. केवळ व्यावसायिक प्रकारच्या कारणांसाठी जिथे व्हॉट्सऍपचा वापर होतो, तिथेच या धोरणांचा परिणाम जाणवेल, असे सांगण्यात आले आहे. असे असले तरी यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिला प्रश्न म्हणजे केवळ व्यावसायिक वापरासाठीच्या व्हॉट्सऍपसाठी जर हे धोरण अवलंबले जाणार असेल तर मग इतका गदारोळ होण्याचे कारण काय? तसेच व्हॉट्सऍपने केलेला खुलासा कितपत विश्वासार्ह आहे? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सऍपचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे?
सर्वप्रथम व्यावसायिक कारणांसाठी व्हॉट्सऍपचा वापर करणाऱ्यांवर काय परिणाम होईल हे पाहू. समजा, एखाद्या रेस्टॉरंटने आपल्या व्यवसायाची जाहिरात व्हॉट्सऍपवर केली असेल आणि आपण ती पाहून तिथे आपल्याला आवश्यक असणाऱ्या अन्नपदार्थांची ऑर्डर दिली, तर त्यावेळी ती माहिती व्हॉट्सऍपकडून संकलित केली जाईल आणि संबंधित कंपनीकडे दिली जाईल. तथापि, केवळ त्या कंपनीकडेच ती न दिली जाता त्या कंपनीचे आणि व्हॉट्सऍपचे भागीदार, तसेच व्हॉट्सऍपची मूळ कंपनी असणारी फेसबुक या सर्वांकडे ती पाठवली जाईल. त्यानंतर फेसबुकला ती माहिती इतर जाहिरातदारांना विकण्याचेही स्वातंत्र्य असेल. परिणामी, आपल्याला फूड डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांच्या, विविध रेस्टॉरंटस्च्या आणि त्याच्याशी संबंधित जाहिराती व्हॉट्सऍपवर दिसू लागतील. केवळ जाहिरातींपुरता हा मुद्दा मर्यादित नाही.
या जोडीला आपले लोकेशन, कॉंटॅक्टस्, आयपी ऍड्रेस आणि अशी अन्य माहितीही व्हॉट्सऍप यानिमित्ताने आपल्याकडून घेऊ शकणार आहे. यासाठी व्हॉट्सऍपवर एक कोड असेल. संबंधित व्यक्ती अथवा युजर ही सर्वसामान्य आहे की व्यावसायिक आहे, हे या कोडद्वारे समजू शकणार आहे. ती व्यक्ती व्यावसायिक युजर असेल तरच त्या युजरशी संबंधित असलेल्या सगळ्यांची माहिती ट्रॅक केली जाईल.
आजवरचा फेसबुकचा इतिहास पाहिल्यास व्हॉट्सऍपने दिलेल्या खुलाशावर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो. कारण फेसबुककडून वरवर जे सांगितले जाते त्यामध्ये आणि प्रत्यक्षातील कृतीमध्ये बरेचदा फरक असतो. व्हॉट्सऍप हे फेसबुकचेच दत्तक अपत्य असल्याने तिथे यापेक्षा वेगळे काही घडण्याच्या शक्यता दिसत नाहीत.
व्हॉट्सऍपकडून आज असे सांगितले जात आहे की, नवीन धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरही आम्ही दोन व्यक्तींमध्ये होत असलेले संभाषण किंवा एखाद्या ग्रुपमध्ये होत असलेले संभाषण सुरक्षित ठेवणार आहोत. (याला एण्ड टू एण्ड एन्क्रिप्शन असे म्हणतात. याचाच अर्थ ती माहिती मूळ ठिकाणापासून निर्धारित केलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती माहिती सुरक्षित ठेवली जाते. खुद्द व्हॉट्सऍपलाही ती कळू शकत नाही. ती केवळ त्या दोन व्यक्तींमध्येच किंवा ग्रुपमध्येच राहते.) पण या आश्वासनावर विश्वास ठेवता येणार नाही.
भविष्यात अनधिकृतरित्या, सर्व कायदे मोडून, पळवाटा शोधून, नियम धाब्यावर बसवून सर्वसामान्य युजर्सची माहितीही व्यावसायिक कारणांसाठी इतर कंपन्यांसोबत व्हॉट्सऍपकडून शेअर केली जाऊ शकते. कारण फेसबुकने इतिहासात हे केलेले आहे. त्यामुळे व्हॉट्सऍपकडून आलेला खुलासा व त्यातील समर्थन हे लंगडे वाटते. तसेच ते सार्वत्रिक टीका झाल्यानंतर आलेले असल्याने हे स्पष्टीकरण म्हणजे केवळ सारवासारव आहे असे वाटते. खरोखरीच जर व्यावसायिक वापरासाठीच्या व्हॉट्सऍप युजर्सकरिता हा धोरणबदल असेल तर इतका गदारोळ होईपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकताच नव्हती. सुरुवातीलाच ते नीटपणाने मांडायला हवे होते. पण तसे न झाल्याने या खुलाशावर सहज विश्वास ठेवता येणार नाही.
गेल्या काही वर्षांत व्हॉट्सऍपचा वापर करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. 2017 मध्ये भारतात व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 20 कोटी इतकी होती; 2019 मध्ये ती जवळपास 40 कोटी म्हणजे दुप्पट झाल्याचे समोर आले. त्यावेळी भारतातील स्मार्टफोन युजर्सची संख्या 45 कोटी होती. याचाच अर्थ स्मार्टफोनचा वापर करणारे 90 टक्के लोक व्हॉट्सऍपचा वापर करतात. बदलत्या काळानुसार, गरजांनुसार व्हॉट्सऍपने नवनवीन फीचर्स आणत आपली लोकप्रियता वाढत राहील याची अचूक दक्षता घेतली. परिणामी, अशा प्रकारचे अन्य ऍप्स अस्तित्वात असूनही वापराविना पिछाडीवर राहिले. आता व्हॉट्सऍपच्या नव्या धोरणातील धोका लक्षात आल्यानंतर या ऍप्सविषयीची चर्चा होऊ लागली आहे. यामध्ये सिग्नल हे ऍप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. याचे कारण हे ऍप ओपन सोर्स आहे. म्हणजेच यावर कुणाची मालकी नाही.
फेसबुकसारखा त्यावर नियंत्रण ठेवणारा कोणी कार्यकारी अधिकारी किंवा संचालक मंडळ नाहीये. त्यामुळे युजर्सची माहिती यावर सुरक्षित राहू शकेल, असे म्हटले जाते. याखेरीज टेलीग्राम या ऍपचाही बोलबाला आहे. हेही ओपन सोर्स ऍप आहे. अर्थात, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, इंटरनेटवर आपण एकदा एखादी माहिती शेअर केली किंवा दुसऱ्याला कोणत्याही स्वरूपात पाठवली तर त्यानंतर ती माहिती आपली राहत नाही. त्यामुळे टेलीग्राम, सिग्नल अथवा अन्य कंपन्या आज आपली खासगी माहिती शेअर करत नसतील, सुरक्षित ठेवत असतील तरी उद्या तसेच घडेल याची शाश्वती देता येत नाही. एखाद्या कंपनीने जरी प्रामाणिकपणाने यासाठी प्रयत्न केला आणि युजर्सना दिलेला शब्द पाळला; तरी त्या माहितीची चोरी होऊ शकते, हॅकर्सकडून त्यावर डल्ला मारला जाऊ शकतो. त्यामुळे लोकांनीच याबाबत अत्यंत सावधगिरीने काळजी घेणे आवश्यक आहे.
आपण किती आणि कुठल्या प्रकारची माहिती सोशल नेटवर्किंग साइट्सवर, मेसेजिंग ऍप्सवर शेअर करायची याबाबत तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या ऍप्सवर वा साइट्सवर आपली जन्मतारीख, आपले आर्थिक व्यवहार, आपली जवळची माणसे कोण आहेत याविषयीची माहिती, आपले खासगी फोटो-व्हिडिओ, आपण काय खातो-पितो याची इत्यंभूत माहिती द्यायची का, लोकेशन शेअर करायचे का याबाबत पुरेशी काळजी घेतली तर माहितीच्या गैरवापराचे प्रश्नच उद्भवणार नाहीत.
व्यावसायिक कारणासाठी व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांना कंपनीने स्पष्टपणानेच त्यांची माहिती वापरणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ती वापरू द्यायची की नाही, याचा विचार सदर युजर्सनी करायचा आहे. यासंदर्भात दुहेरी वापराचाही पर्याय अवलंबता येईल. यामध्ये जी माहिती दुसऱ्याच्या हाती पडल्यास आपले मोठे नुकसान होऊ शकते, अशी शक्यता वाटत असल्यास त्यासाठी टेलिग्रामसारख्या मेसेजिंग ऍपचा वापर चालू करणे आणि सर्वसाधारण माहितीसाठी व्हॉट्सऍपचा वापर सुरू ठेवणे अशी विभागणी करता येऊ शकेल.
व्हॉट्सऍपच्या या नव्या धोरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाश्चिमात्य कंपन्यांच्या व्यावसायिक रणनीतीचा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे. या कंपन्यांकडून सुरुवातीला अशा प्रकारच्या सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. हळूहळू लोकांना त्याची सवय जडू लागते. ही सवय वाढत जावी यासाठी सातत्याने त्यात नवनवे फीचर्स समाविष्ट केले जातात. कळत-नकळत लोकांचे त्यावरचे अवलंबित्व वाढत जाते. या सेवांचा वापर वाढू लागतो. कालांतराने तो इतका वाढतो की त्याचे रुपांतर व्यसनामध्ये होते. पुढे जाऊन या व्यसनातून बाहेर पडणे अवघड आहे, असे वाटण्यासारखी स्थिती निर्माण होते. मग अशा आगतिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी अचानक शुल्क आकारणी किंवा धोरणात बदल करणे यांसारखे अस्र या कंपन्यांकडून उगारले जाते.
साहजिकच अशा वेळी त्याच्या आधीन गेलेले लोक चिंतेत पडतात, संभ्रमित होतात. दुसरा पर्याय काय वापरायचा याबाबत शोधाशोध करू लागतात. वास्तविक, काही दिवस मी कोणतेच मेसेजिंग ऍप वापरणार नाही, असा विचार कुणी करताना दिसत नाही. ज्यांना खरोखरीच याची गरज आहे त्यांना व्हॉट्सऍप वापरू नका असे सांगता येणार नाही; परंतु गरजेविना अकारण त्यावर वेळ घालवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे हेही दुर्लक्षून चालणार नाही. ही प्रवृत्ती किंवा मानसिकताच या कंपन्यांनी ओळखलेली आहे. बुद्धिमान माणूस असूनही आपण कळत-नकळत त्याकडे केवळ आकृष्टच होत नाही, तर गुरफटून जातो.
खरे पाहता, इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स यांचा वापर किती करायचा, करायचा की नाही याबाबत प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आली आहे. आपणच आपली वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ जर भरमसाठ प्रमाणात शेअर करणे थांबवले, त्यांचा वापर मर्यादित ठेवला तर व्हॉट्सऍप, फेसबुक यांसारख्या कंपन्यांचे छुपे हेतू कधीच साध्य होऊ शकणार नाहीत. दुर्दैवाने, आजचे समाजवास्तव पाहता असे घडणे अवघड वाटते. उलट येणाऱ्या काळात यासंदर्भातील प्रश्न अधिकाधिक गंभीर आणि बिकट बनत जाणार आहेत.
ते केवळ खासगी माहिती चोरण्यापुरते मर्यादित न राहता सामूहिक पातळीवर त्याचा दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुका जिंकण्यासाठी गैरवापर करणे, लोकशाहीवर हल्ला करण्यासाठी एकच प्रकारची विचारसरणी सर्वांवर बिंबवणे, सामाजिक तेढ निर्माण करणे, धर्माधर्मांमध्ये दुही निर्माण करणे, ठरावीक प्रकारच्या लोकांची मते उचलली जातील अशी रचना करणे यांसारख्या अनेक घातक हेतूंसाठी या सर्वांचा वापर वाढत जाणार आहे. म्हणूनच याकडे साकल्याने आणि सद्सद्विवेकबुद्धीने पाहणे अत्यावश्यक आहे.
(शब्दांकन ः हेमचंद्र फडके)
अतुल कहाते, आयटीतज्ज्ञ