मुंबई : मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा केली. दरम्यान, या दोन नेत्यांच्या भेटवरून राज्यात सध्या राजकारण सुरु आहे. याच राजकारणावर आता शिवनेनेने सवाल उपस्थित केला आहे.
‘मुख्यमंत्री ठाकरे यांच्या धावत्या दिल्ली भेटीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. राज्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले यात गैर काय? पण नंतर दोन नेत्यांत पुन्हा स्वतंत्र चर्चा झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले, ते का?’ असा सवाल उपस्थितीत करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेटीमागील घडामोडी जाहीर केल्या आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे.’शनिवारी दिवसभरात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना थेट फोन लावला. मोदी लगेच फोनवर आले.
राज्यातील खुशाली विचारली. ”मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात भेटायचे आहे.” उद्धव ठाकरे पुढे गमतीने म्हणाले, ”अब मेरे साथ दो और साथी है, उनको भी साथ लाना है.” यावर पंतप्रधानांनी लगेच वेळ देतो असे सांगितले व पंतप्रधान कार्यालयाने बुधवारची वेळ नक्की केली. कोणाच्याही मध्यस्थीशिवाय मोदी-ठाकरे भेट झाली हे महत्त्वाचे’ असा खुलासा राऊत यांनी केला.
‘ आज महाराष्ट्राचे राजकारण अशा सीमेवर उभे आहे की, राज्याच्या राजकारणामुळे देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकेल. शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार आलेच असते व त्यात पुन्हा एकदा शिवसेना दुय्यम भूमिकेत सहभागी झाली असती तर नवे काय घडले असते? पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सहभागी झाली हे चित्र कलाटणी देणारे ठरले.
इथे एक लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कधीच समजून घेतला नाही’ असा टोला राऊत यांनी सेनेच्या नेत्यांना लगावला.
‘महाराष्ट्रात पुन्हा उलथापालथ होईल व राजकीय समीकरणे बदलतील अशा पुड्या अधूनमधून सोडल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धावत्या दिल्ली भेटीने त्या पुड्या जरा जास्त गरम झाल्या. त्या कशाच्या आधारावर ते समजून घेणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची आहे, पण महाराष्ट्रातील नेत्यांच्या धसमुसळेपणास त्यांच्या केंद्रीय नेत्यांचा खरेच पाठिंबा आहे काय? प. बंगालात अमित शहा यांनी साम, दाम, दंड, भेद असा वापर करूनही त्यांच्या रणनीतीचे पुरते बारा वाजले. आता इतर राज्यांत धोका पत्करून प्रतिष्ठापणाला लावण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही’ असंही राऊत म्हणाले.
‘अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’ असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
‘देवेंद्र फडणवीस सांगतात, ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. त्याच वेळी चंद्रकांत पाटील ठामपणे सांगतात, महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल. कोणाला कळणार नाही. भाजपचे धोरण स्पष्ट दिसत नाही. सरकारचे काय करायचे ते फडणवीस व पाटील यांनी एकाच टेबलावर बसून काय ते ठरवायला हवे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापैकी एक पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही हे अमित शहा यांनी एकदा स्पष्ट केले. परिस्थिती अद्यापि तीच आहे’ असा टोला राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला.