हैदराबाद – गुजरात मधील 2002 च्या दंगलीदरम्यान बिल्किस बानो हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या 11 दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय मागे घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी तेलंगणाचे मंत्री के टी रामा राव यांनी केली आहे.
या संबंधात जारी केलेल्या एका ट्विटर संदेशात मोदींना उद्देशून त्यांनी म्हटले आहे की, महिलांचा आदर करण्याबद्दल तुम्ही जे बोललात ते तुम्हाला खरोखरच अभिप्रेत असेल तर, 11 बलात्कारींना सोडणारा गुजरात सरकारचा माफीचा आदेश मध्यस्थी करून मागे घेण्याची कृती करा. तुम्ही राष्ट्राप्रती विवेक दाखवण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या या सर्व अकरा आरोपींना गुजरात सरकारने प्रचलीत माफी धोरणानुसार नुकतेच कारागृहातून सोडले आहे.
सरकाराने भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिते मध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, जेणेकरून कोणत्याही बलात्काऱ्याला न्यायव्यवस्थेद्वारे जामीन मिळू शकणार नाही. न्यायपालिका जलद गतीने आणि सर्वोत्तम कामगिरी बजावू शकेल याची खात्री करण्यासाठी मजबूत कायदे हा एकमेव मार्ग आहे, असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या निर्णयाबद्दल भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरणाबद्दल बोलले आणि या पार्श्वभूमीवर या आरोपींची सुटका केली गेली आहे हे काय दर्शवते असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.