नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बापूंना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला.
त्या म्हणाल्या ज्यांना स्वतःला सर्वेसर्वा म्हणण्याची इच्छा आहे, ते राष्ट्रपितांचे आदर्श कशे समजू शकतात? दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीची पदयात्रा संपल्यानंतर राजघाट येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही टीका केली.
आज आपला देश आणि संपूर्ण जग महात्मा गांधीजींची १५०वी जयंती साजरी करीत आहे. गांधीजींचे नाव घेणे सोपे आहे, परंतु त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणे कठीण आहे. गेल्या काही वर्षांत काहीजण साम दाम दंड चा वापर करत स्वतःला सामर्थ्यवान मानतात, अशी टीका सोनिया गांधी यांनी मोदींवर केली.
एवढे करूनही भारत भटकत नाही कारण गांधीजींच्या आदर्शांचा पाया हा आपल्या देशाचा पाया आहे. भारत आणि गांधी हे एकमेकांचे प्रतिशब्द आहेत. मात्र काही लोक त्यास उलट करण्याचा प्रयत्न करतात. गांधींना नव्हे तर आरएसएस भारताचे प्रतीक व्हावे, अशी काही लोकांची इच्छा आहे. मला अशा लोकांना सांगायचे आहे की आपल्या देशातील मिश्रित संस्कृती आणि समाज गांधींच्या सर्वसमावेशक व्यवस्थेव्यतिरिक्त कशाचाही विचार करू शकत नाही, असे सोनिया गांधी म्हणाल्या.