वरवंड – माझी आणि मुख्यमंत्र्यांची ओळख आहे, याबाबत कोणाला शंका नसावी. 2009 ते 2014 या वेळच्या आपल्या तालुक्याच्या आमदारांची आणि मुख्यमंत्र्यांची ओळख तरी झाली होती का, ही माझी शंका आहे. याबाबत त्यांना विचारा. एखादा तरी पुरावा दाखवा. त्यावेळी त्यांनी मुंबईत जाऊन काय केले? आणि आता मुंबईत जाऊन काय करणार? आपल्या समोरचे उमेदवार 70 वर्षांचे आहेत. आमचे वय उमेदीचे आहे. आम्हाला काम करू द्या, ज्यांना खरंच आरामाची गरज आहे त्यांना आराम करून द्या. सगळ्यांनी याचा विचार करून मतदान करावे, अशी टीका राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचे नाव न घेता केली.
दौंड विधानसभा मतदारसंचे महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ पाटस येथे सभेचे आयोजन केले होते, त्यावेळी कुल यांनी वरील टीका केली. याप्रसंगी रासपचे दादा केसकर, हरीश खोमणे, राजाराम तांबे, तानाजी दिवेकर, नंदू पवार, महेश भागवत, आरपीआयचे नागसेन धेंडे , साहेबराव वाबळे, डॉ. मधुकर आव्हाड, वसंत साळुके, समीर सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मी वरिष्ठांचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी वरिष्ठांनी निर्णय घेऊन मला रासपकडून निवडणूक लढवण्यास सांगितले होते. त्यावेळी मी निवडणूक रासप पकडून लढवली. यावेळी मी रासपकडे उमेदवारी मागितली होती. भाजपकडे उमेदवारी मागितली नव्हती; परंतु महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी म्हणून मी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या 124 उमेदवारांनी धनुष्य हे चिन्ह व उर्वरित 164 उमेदवारांनी कमळ हेच चिन्ह घेतले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या वरिष्ठ मंडळींनी दिलेला आदेश मी पाळला आहे, अशी माहिती कुल यांनी पाटस येथील जाहीर सभेत उपस्थितांना दिली. सूत्रसंचालन साहेबराव वाबळे यांनी केले.
“विरोधी मंडळी टीका करण्यातच मानतात धन्यता’
विरोधी मंडळी फक्त टीका करण्यात धन्यता मानतात यांनी यांच्या 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नेमके काय केले? कोणत्या संस्था काढल्या? केडगावचा 100 कोटींचा विकासकरू म्हणले कुठे गेला तो विकास? असा प्रश्न महेश भागवत यांनी उपस्थित केला.