नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांसी संवाद साधणार आहेत. उद्या म्हणजेच ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच महत्त्वाच्या विषयांवर मन की बातच्या माध्यमातून देशातील नागरिकांना संबोधित करत संवाद साधत असतात. पण यावेळी सर्वांचे लक्ष लॉकडाउनसंबंधीच्या निर्णयाकडे असणार आहे. ३१ मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत अल्याने नरेंद्र मोदी नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’साठी लोकांकडून सूचना, संकल्पना तसंच विषय मागवले होते. नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं होतं. योगायोगाने ३१ मे रोजीच लॉकडाउन संपत असल्याने नरेंद्र मोदी लॉकडाउन उठवणार का ? की लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात होईल याकडे देशाचे लक्ष आहे.
दरम्यान शुक्रवारी अमित शाह यांनी लॉकडानच्या संभाव्य मुदतवाढीबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बहुतेक मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी आणखी १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली असल्याने १ जूनपासून लॉकडानचा पाचवा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.