नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चाही केली होती. त्यामुळे आज ते काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान देशातील लॉकडाऊन वाढवला जाण्याचेही संकेत मिळाले होते.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. लॉकडाउनमध्ये राज्यांनी अधिकारांच्या विकेंद्रीकरणाची मागणी पंतप्रधानांकडे केली होती. तामिळनाडू, तेलंगण, छत्तीसगड, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी प्रवासी रेल्वे सुरू करण्यास विरोध करत लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची सूचना केली. तर लॉकडाउन उठवण्याबाबत ठोस धोरण आणि दिशा हवी, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली होती.
पंजाबने लॉकडाउन कायम ठेवण्याचा पण, आर्थिक व्यवहारांना हळूहळू वेग देण्याची भूमिका घेतली. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सुट देण्यात आली होती. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा लागू झाल्यास त्यात आणखी काही सुट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीदरम्यान याबाबत संकेत दिले होते.