मुंबई – अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. प्रधानमंत्री हे गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री होते तसेच प्रधानमंत्री म्हणून एक मोठा कालखंड त्यांनी गुजरातलाच दिला आहे. तरीही गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना बाजी लावावी लागली यावरून भाजपचे तिथे किती स्थान आहे हे स्पष्ट होत असं संजय राऊत म्हणालेत.
“खरं म्हणजे कोणत्याही प्रचाराशिवाय त्यांनी ही निवडणूक जिंकायला हवी होती पण प्रधानमंत्री,गृहमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षांनी गुजरातमध्ये प्रचार केला. कोणी काही म्हणू द्यात निकाल काय लागतील हे मी सांगू शकता नाही. लोक असं म्हणतात की,निवडणूक यंत्रणांवर आमचा विश्वास नाही. परंतु ही लोकशाही आहे असं होणार नाही,मशीन गडबड करून किती करणार ही लोकांची भावना आहे मी नाही सांगत त्यामुळे आपण वाट पाहूया असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
PM मोदींनी केले मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 14 मध्य आणि उत्तर जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात 61 राजकीय पक्षांचे 833 उमेदवार रिंगणात आहेत.अहमदाबादमधील राणीप येथील शाळेत उभारलेल्या मतदान केंद्रावर पंतप्रधान मोदींनी मतदान केले. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. ते पायीच मतदान केंद्रावर पोहोचले.