मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या बाधितांची संख्या घटली आहे. रुग्णसंख्येचा आलेख खाली येऊ लागल्याने आता राज्यात १ जूनपर्यंत लागू करण्यात आलेला लॉकडाउन मागे घेण्यात येतो काय? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकार दरबारी देखील याबाबतची खलबते सुरु असून काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी, जनतेला लॉकडाउनमधून दिलासा देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे वृत्त आहे.
अशातच आज, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लॉकडाउन उठवण्याबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे.
मंत्री वडेट्टीवार यांनी, “रेड झोनमधील गावांना सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. जिल्ह्यांनी जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत तर रुग्ण कमी असलेल्या तालुक्यांमध्ये थोडी सवलत द्यावी. बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्यापटप्य्याने लॉकडाउन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत,” अशी माहिती दिली.
मुंबईची लोकल सामान्यांसाठी सुरु होणार?
“मुंबईची लोकल सुरु करु नका कारण तिथे करोनाचा मोठा फैलाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे रेल्वेत जी गर्दी होते त्याचा गांभीर्याने विचार व्हावा अशी अनेकांची मागणी आहे. म्हणून आम्ही अत्यावश्यक सेवा सोडून कोणालाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी देणार नाही,” असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यातील लॉकडाउन एकदम उठवण्यात येणार नाही, तो टप्प्याटप्प्याने उठवण्यात येईल असे संकेत दिले होते.