मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटके, मनसूख हिरेन यांची आत्महत्या याप्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणासंदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. भाजपने वाझे प्रकरणावरून सरकारला घेरले असून या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या यासंदर्भात बैठका सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी फेसबुकवर विस्तृत पोस्ट लिहली आहे.
काय आहे सुरेश खोपडे यांची फेसबुक पोस्ट :
सचिन वाझेंच्या करामतीमुळे मुंबई पोलीस दल पुन्हा चर्चेत आले आहे व आणखी चर्चा व्हायला पाहिजे. मुंबई रेल्वे पोलिस कमिशनर म्हणून तीन वर्षानंतर उत्तर मुंबई विभागाचे अॅडिशनल पोलिस कमिशनर म्हणून मी अडीच वर्षे मुंबईत काम केले होते. निवृत्त झाले की तूम्हा लोकांना वाचा फुटते अस म्हटलं जातं. पण मी नोकरीत असतानाही लिहीत व बोलत होतो. मुंबईतील वातावरण, तिथली गुन्हेगारी हे माझ्यासारख्याला अलीबाबाची गुहाच होती. त्या अभ्यासानुसार “मुंबई जळाली भिवंडी का नाही”हे पुस्तक प्रकाशित केले होते. महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक विभागात कोणत्या तरी जिल्ह्यात मी एसपी म्हणून काम केले होते त्या आधारावर ग्रामीण भागातील पोलीस प्रशासन कसे असावे यावर मी केलेल्या प्रयोगावर आधारित पुस्तक लिहिले होते. मुंबईत असताना”महानगरातील पोलिस प्रशासन, उत्तर मुंबई प्रयोग” या नावाने पुस्तक प्रकाशित केले होते.
मुंबई शहरातील एन्काऊंटरस्, यावर मी खूप मटेरियल गोळा केले होते. मारल्या गेलेल्या बळींची सर्वांगाने माहिती गोळा करणे सुरू केले. दोन सस्पेंड असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट माझ्या हद्दीतील पोलिस स्टेशनला अट्याच केले होते. ते संशोधन पूर्ण करू शकलो नाही पण त्या विषयाचं भयानक वास्तव पुढे आले. आणि उत्तरही सापडले की इथली “गुन्हे न्याय व्यवस्था(criminal justice system) कालबाह्य”आहे. ती बदलण्याऐवजी तात्पुरता इलाज म्हणून गुन्हेगाराला तत्काळ शिक्षा देण्यासाठी तसेच मीडिया, जनता, विरोधक…. यांना खुश करण्यासाठी एन्काऊंटर सुरू झाले. सचिन वाझे हे त्याचेच प्रॉडक्ट!
पोलिस आयुक्तांच्या परवानगीशिवाय कुठलाच एन्काऊंटर होवू शकत नाही. मग हे स्पेशालिस्ट एकदम आयुक्त किंवा गृहमंत्र्यांना भेटत. मधल्या अधिकाऱ्यांना फाट्यावर मारत असत. अमाप पैसा, अमाप दहशत, अमाप प्रसिद्धी, अमाप अधिकार. असे वाझें कुणाला घाबरतील? त्यांच्यावर अंकुश कोणता ख्वाजा युनूसचा काटा वाझेंनी ज्या पद्धतीने काढला होता ती फार अमानवी केस होती ते लपविण्यासाठी केलेली धडपड अशीच पोरकट होती.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट असे अघोरी व धोकादायक कृत्य कुणासाठी करत असावेत? समाजात शांतता सुरक्षितता राहावी म्हणून? एक कर्तव्य, जबाबदारी म्हणून? सत्याची चाड म्हणून? पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून?…..की? माझ्या निरीक्षणावरून या पैकी कोणतेच नाही! दुसऱ्याच्या बापासाठी कुणीही आपल्या मिशा काढायला तयार होत नाहीत!
व्यक्तिगत फायदा (आर्थिक, मेहेरबानी, भावनिक…)असल्याशिवाय असे कृत्य करायला तयार होत नाहीत.
अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याने गृहमंत्री अगर मुख्यमंत्री यांना काय लाभ होणार? सरकार अगर शिवसेनेला कुठला लाभ होईल? काही होईल असे मला तरी वाटत नाही. वाझेंना व्यक्तिगत मोठा लाभ होईल असा त्याचा होरा असावा. अंबानी, जगातला एक श्रीमंत व्यक्ती. त्याच्या जीविताला असलेला धोका टाळल्याचे, गुन्ह्याचा तपास केल्याचे व आरोपीला बेड्या ठोकल्याचे श्रेय त्याला मिळणार होते. राज्य व केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शाबासकी मिळाली असती. अर्णवच्या केसमध्ये केंद्रीय गृहमंत्री नाराज होते ते खुश झाले असते. या सगळ्याचा फायदा ख्वाजा युनुसची जी केस त्याचे विरूद्ध चालू आहे त्यातून सुटण्यास मदत झाली असती. असा हेतू वाजेंच्या मनात असावा असे आतातरी वाटते, पुढे वेगळेही निघू शकते. पाहू.
अशा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा राजकारणात दबदबा असतो. वझे तर शिवसैनिकच होते. प्रचंड पैसा असल्याने ते खूप होत्याचे नव्हते करणारे (great manipulator) असतात. कोणत्याही सत्ताधारी नेत्याला तात्काळ रिझल्ट देणारे नोकरशहा हवे असतात. नवख्या राजकारण्यांना त्याची चाल समजून येत नाही. बऱ्याच वेळा मनोधैर्य खच्ची व्हायला नको म्हणून राजकारणी त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. मग ते सरकारलाच गोत्यात आणतात.
त्यातून सचिन वाझे, भूषण उपाध्याय… निर्माण होतात. महाराष्ट्रात सात लाखापेक्षा जास्त लोक असताना सरकारला एका सचिन वाझेंची गरज का भासावी? तो एवढा शिरजोर का बनावा? कारण प्रशासनात सगळ्या लोकांचा वापर कसा करायचा याची शास्त्र शुद्ध व्यवस्था नाही. मुळात पोलिस व्यवस्था कालबाह्य आहे. मलाच फार समजत वा अक्कल आहे असा माझा दावा नाही पण इतर दुसरा पर्याय मिळेपर्यंत मी केलेल्या शिफारशी विचारात घ्या असे मी प्रत्येक सरकारला विनंती करत असतो. तशी महाविकास आघाडी सरकारलाही केलीय.
बहुंतांश मीडिया, जनता, विरोधी पक्ष, विचारवंत, साहित्यिक अशा प्रश्नांची उत्तरे व्यक्तीमध्ये शोधतात. मग सचिन वाझे, परमबीर, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे या नावांचा उच्चार होतो. वेळोवेळी नाव बदलतात. व्यवस्था तीच रहाते. महाराष्ट्राच्या या अवस्थेस कोण जबाबदार? कोण दोषी? माणसामध्ये १० टक्के दोष तर ९० टक्के इथली व्यवस्था जबाबदार/दोषी आहे! त्याचा परिपाक म्हणून ‘चेहरे नको व्यवस्था बदलुया ……अठरा पगड मावळे शिवशाही मॉडेल”(२०२०) हे पुस्तक मी प्रकाशित केले आहे.
सचिन वाजे, परमबीर सिंग, भूषण उपाध्याय… या महामानवांच्या निर्मितीची मुळे या व्यवस्थेत दिसतात. या सरकारलाही मी या शिफारशी पाठविल्यात! मी माझं काम करतो.कुणी वंदा या निंदा.
असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर वाझें व आयपीएस परंबिरसिंग निर्माण का व कोण करत?
सचिन वाझेंच्या करामती मुळे मुंबई पोलीस दल…Posted by Suresh Khopade on Tuesday, March 16, 2021