-अनिल देशमुख यांचा केंद्र सरकावर निशाणा
– डोवाल यांच्या भेटीनंतरच मौलाना फरार
मुंबई : देशभरात करोनाविरोधात युद्ध सुरु असतानाच दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये तबलिगींच्या सहभागावरून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी वेैंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना रात्री 2 वाजता मरकजमध्ये का पाठवले? असा सवाल उपस्थित करीत डोवाल यांच्या भेटीनंतरच मरकजचे मौलाना दुसऱ्या दिवशी फरार झाल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.
अनिल देशमुख यांनी बुधवारी आपल्या लेटरहेडवर तबलिगीच्या कार्यक्रमासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मरकजच्या आयोजनला परवानगी का दिली? हा कार्यक्रम का रोखला नाही? तबलिगींशी तुमचे संबंध काय आहेत, असे अनेक सवाल देशमुख यांनी उपस्थित करत केंद्रिय गृह मंत्रालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. महाराष्ट्रात वसई येथे 15 आणि 16 मार्च 2020 रोजी तबलिगीचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमात 50 हजार तबलिगी सहभागी होणार होते. मात्र सरकारने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली.
असे असताना निजामुद्दीन येथे मरकजच्या कार्यक्रमला केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी का दिली? या कार्यक्रमामुळे सर्व राज्यात कोरोनाचा संसर्ग होऊन प्रादुर्भाव वाढला याला जबाबदार कोण? असा सवाल देशमुख यांनी केला आहे. मरकजच्या शेजारी निजामुद्दीन पोलीस ठाणे असताना मरकजमध्ये डोवाल यांना का पाठवले? हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे होते की दिल्ली पोलीस आयुक्तांचे? आता दोघेही मरकजच्या कार्यक्रमावर बोलण्याचे का टाळत आहेत? डोवाल यांना भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी मौलानासाहेब कुठे फरार झाले? अशी सरबत्ती अनिल देशमुख यांनी केली आहे.
अपयश झाकण्यासाठी टीका
ही वेळ राजकारण करण्याची नाही. तरीही मतांचे राजकारण करण्यासाठी आणि आपले अपयश झाकण्यासाठी अनिल देशमुख हे केंद्रावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जे मरकजच्या कार्यक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्रात आले त्यांना हुडकून काढण्यात सरकारला अजून यश आले नाही. हे अपयश लपविण्यासाठी देशमुख यांनी पत्राच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
जे मरकजमध्ये सहभागी झाले होते त्यापैकी अजून 50 ते 55 लोक सरकारला सापडले नाहीत. हे लोक मानवी बॉम्बसदृश आहेत. त्यांना शोधले नाही तर कोरोनाचा मोठ्याप्रमाणात संसर्ग वाढेल, अशी भीतीही फडणवीस यांनी व्यक्त केली.