नवी दिल्ली – देशातील सलग तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत 17 मे यादिवशी संपणार आहे. त्यानंतर करायचे काय? कुठले निर्बंध शिथिल करायचे, याविषयी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांकडून सूचना मागवल्या आहेत. अर्थात, पूर्ण लॉकडाऊन मागे घेतला जाणार नसल्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे.
केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याविषयी 15 मेपर्यंत सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, केजरीवाल यांनी मंगळवारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. आम्ही तज्ञ आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करणार आहोत. दिल्लीतील जनतेनेही उद्या (बुधवार) सायंकाळी 5 वाजेपर्यंत आमच्यापर्यंत सूचना पोहचवाव्यात. त्यानंतर गुरुवारी दिल्ली सरकार आपला प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवेल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
एकीकडे आपल्याला करोनापासून स्वत:चा बचाव करायचा आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेचे आरोग्यही आपल्याला चांगले ठेवायचे आहे. त्यामुळे कुठल्या क्षेत्रांत आणि किती प्रमाणात निर्बंध शिथिल करायचे याविषयी आम्हाला सूचना अपेक्षित आहेत. अर्थात, दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाऊ शकत नाही, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.