नवी दिल्ली – गुजरातमध्ये सन 2002 साली झालेल्या दंगलींच्यावेळी बिल्कीस बानो नावाच्या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या घरातील सात जणांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना गुजरातमधील भाजप सरकारने कारागृहातून सोडून दिले आहे.
या संबंधात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या कृत्याद्वारे त्यांनी देशातल्या महिलांना काय संदेश दिला आहे असा सवालही त्यांनी ट्विटरवर केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, पाच महिन्याच्या गर्भवती महिलेवर बलात्कार, आणि तिच्या डोळ्यादेखत तिच्या तीन वर्षाच्या मुलीची हत्या करणाऱ्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी सोडून दिले गेले आहे.
नारी शक्तीच्या खोट्या घोषणा देणारे देशातील महिलांना अशा कृतीतून नेमका काय संदेश देत आहेत? प्रधानमंत्रीजी संपूर्ण देश आपल्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत असलेला फरक पहातो आहे असे राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
बिल्कीस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 आरोपींना अलीकडेच गुजरात सरकारने कारागृहातून सोडले आहे. यावरून भाजप सरकारच्या विरोधात देशभर संताप व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही वरील संदेश प्रसारित करून सरकारवर टीका केली आहे.