नागपूर : मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सोबतच 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार भाजपकडून टीका करण्यात येत आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे.
केवळ चार दिवसांत केंद्र सरकारने अशी काय जादू केली की मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही. केंद्र सरकारने अशी काय जादू केली, न्यायालयाला काय डेटा दिला आणि मध्य प्रदेशला आरक्षण मिळाले, हे निकालाची प्रत मिळाल्यानंतर स्पष्ट होईल, असं नान पटोले यांनी नमूद केलं.
याआधी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशच्या निकालावरून महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली होती. महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली. मध्यप्रदेशने पहिला निर्णय विरोधात आल्यानंतर स्थानिक पातळीवर डेटा गोळा केला. मात्र महाराष्ट्रातील मंत्री फक्त मोर्चे काढत बसले. काहीही केलं नाही. केवळ राजकारण झालं. मुख्यमंत्र्यांनी देखील यात लक्ष घातल नाही. त्यामुळे कोणताही इम्परिक डेटा तयार झाला नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.