राहाता – देशाचा जीडीपी खाली आला म्हणून आरडाओरड करणाऱ्यांनी मागील सहा महिन्यांत राज्यातील जनतेला कोणती मदत केली, याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देतानाच, विकासदराचा विचार करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकटाच्या काळात राष्ट्रहिताबरोबरच लोकहित साधले. देशातील सामान्य माणसाला आत्मनिर्भरतेने पुन्हा उभे करण्यासाठी आत्मविश्वास दिला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील 350 आशा सेविकांना आ. विखे पाटील यांच्या सहकार्याने कोविड विमा पॉलिसीचे कवच देण्यात आले. या पॉलिसींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताहादरम्यान वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, ऍड. रघुनाथ बोठे, शिवाजीराव गोंदकर, तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, सभापती नंदाताई तांबे, शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, डॉ. राजेंद्र पिपाड, सभापती बापूसाहेब आहेर, शहराध्यक्ष अनिल बोठे, शरद नाना थोरात, जि. प. सदस्या कविता लहारे, तहसीलदार कुंदन हिरे, आरोग्याधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आदी उपस्थित होते. मोफत अपघात विमा योजनेअंतर्गत नऊ कुटुंबांना 18 लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण यावेळी करण्यात आले.
आ. विखे पाटील म्हणाले, कोविड संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या आशा सेविकांकडे राज्य सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्यावर जबाबदारीहोती, तेच घरात बसल्यामुळे सामान्य माणसाच्या हितासाठी कोणतेही काम राज्यात झाले नाही.
याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी निर्णय प्रक्रिया राबविली. 20 लाख कोटी रुपयांचे आत्मनिर्भर भारत योजना पॅकेज जाहीर करुन देश पुन्हा आत्मविश्वासाने पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. देशाचा विकास दर खाली आला म्हणून पंतप्रधान मोदींच्या नावाने ओरडणाऱ्यांनी मागील सहा महिन्यांत राज्यातील जनतेला कोणता दिलासा दिला, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला लगावून आ.
विखे पाटील म्हणाले, देशाचा विकासदर खाली आला की वर गेला, याचा विचार करण्यापेक्षाही पंतप्रधान मोदींनी देशातील सामान्य माणसाचा विचार केला. त्यामुळेच इतर देशांच्या तुलनेत भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर जास्त आहे. मोदीजींच्या निर्णयक्षमतेमुळे हा देश संकटातून वाचला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. वाकचौरे यांनीही राज्य सरकारवर टीका केली.