मुंबई – दळणवळणाच्या साधनांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. नव्या जमान्याचा वाहतुक साधनांमुळे वेळ, पैसा व मेहनत या तिन्ही आघाड्यांवर मानवाला मोठा फायदा झाला. अन् कधीकाळी कित्येक महिने घेणारा प्रवास अगदी काही तासांवर येऊन ठेपला. असो. दळणवळणाच्या साधनांचे आणि त्यांनी प्राप्त केलेल्या गतीचे महत्व आपण जाणून आहोतच. मात्र आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा प्रवासाबाबत ज्याने गतीच्याबाबतीत गोगलगायलाही मागे सोडलं आहे.
नाशिक ते तिरुअनंतपुरम हे १७५७ किलोमीटरचे अंतर. जर तुम्ही खासगी गाडीने प्रवास करत असाल तर हे अंतर कापायला तुम्हाला जवळपास २० तास लागतात. आता एखादं अवजड वाहन हा प्रवास करत असेल तर या प्रवासासाठी त्याला दुप्पट किंवा फारतरफार तिप्पट वेळ लागेल हे मानायला हरकत नाही. मात्र कुणी जर तुम्हाला सांगितलं की, एका ट्रकने हा प्रवास पूर्ण करायला चक्क एक वर्ष घेतलं! तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल. परंतु हे वृत्त १००% खरं आहे.
त्याचं झालं असं की, जुलै २०१९मध्ये नाशिक येथून एक ट्रक अवकाश संशोधनाची काही एक यंत्रसामग्री घेऊन केरळातील तिरुअनंतपुरमकडे निघाला होता. ट्रकवर Aerospace Horizontal Autoclave नावाचं एक यंत्र लादण्यात आलेलं. या यंत्राचं वजन होतं केवळ ७० टन!
आता एवढा बोजा लादल्यामुळे बिचारा ट्रक दिवसातून केवळ ५ किलोमीटर अंतर कापू शकत होता. शिवाय या यंत्राला कुठलाही धक्का पोहचू नये यासाठी तब्बल ३४ जण ट्रकसोबत अक्षरशः पायी चालत होते. अशातच कोरोना लॉक डाऊनमुळे या ‘ट्र्क’ दलाला अपेक्षित ठिकाणी पोहचायला आणखी उशीर झाला. अखेर जुलै २०१९मध्ये निघालेला हा ट्रक १९ जुलै २०२० रोजी तिरुअनंतपुरम मधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे पोहचला.
Kerala: A truck, carrying an aerospace horizontal autoclave for delivery to Vikram Sarabhai Space Centre in Thiruvananthapuram, reached the city today a year after starting from Maharashtra. Staff say, “Started in July 2019 & travelled across 4 states. Hope to deliver this today” pic.twitter.com/XNaCjXa1C3
— ANI (@ANI) July 19, 2020