संगमनेर -निळवंडेसाठी ज्यांनी मदत केली, आम्ही त्यांचा कायम उल्लेख करतो मात्र तुमचे निळवंडेसाठी योगदान काय? असा सवाल आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे यांना केला. समन्यायी पाणी वाटपाविरोधात संगमनेर व अकोले संघर्ष करत असताना तुम्ही या संघर्षात सहभाग न घेता का गप्प होता? असा सवाल करत संगमनेर तालुका दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नाही, असे ठणकावून सांगितले.
तळेगाव दिघे येथे 25 कोटींच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ सुधीर तांबे हे होते. व्यासपीठावर दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, जि. प. सदस्य महेंद्र गोडगे, मिलिंद कानवडे, शंकरराव खेमनर, बेबीताई थोरात, अमित पंडित, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, संपतराव डोंगरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अद्यावत अशा ग्रामीण रुग्णालय आणि सेवा सोसायटीच्या इमारतीचे लोकार्पणही करण्यात आले.
आमदार थोरात म्हणाले की, 1999 ला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. अनेक अडचणी आल्या परंतु माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मोलाचे सहकार्य केले. आज श्रेय घेऊ पाहणाऱ्यांचे यामध्ये कोणतेही योगदान नाही. खरे तर या दिवाळीला पाणी या शिवारात आणायचे होते. परंतु सत्ता बदल झाला आणि कामे थंडावली कामे. ही कामे अंतिम टप्प्यात आहे. आता आपले पाणी कोणीही अडवू शकणार नाही.
याचबरोबर समन्यायी पाणी वाटपाबाबत सातत्याने विष पेरण्याचे काम काही मंडळी करत आहेत. ज्यावेळी अकोले, संगमनेरमध्ये समन्यायी पाणी वाटपाविरोधात आंदोलन केले, आम्ही संघर्ष करत होते. त्यावेळेस या मंडळींनी त्यामध्ये सहभाग घेतला नाही. त्यावेळेस ते गप्प होते. तुम्हीही विधानसभेत होता, त्यावर का बोलले नाही, असा सवाल करताना सत्ता येते आणि जाते, त्यामुळे दबावाचे राजकारण करू नका, असा सल्लाही दिला.
आम्ही कधीही वाईट राजकारण केले नाही, कुणाच्या अन्नात माती कालवली नाही. किंवा कुणाबद्दल वाईटही चिंतले नाही. मात्र, सध्याचे सुरू असले द्वेष भावनेचे राजकारण हे लोक पाहत आहेत. हे विसरू नका. आपल्या तालुक्यात काही खबरे निर्माण झाले असून या खबऱ्यांचा आता जनता नक्की बंदोबस्त करेल,असेही त्यांनी म्हटले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात हजारो कोटींची विकास कामे झाली आहे. निळवंडे धरण पूर्ण करून या कालव्यासाठी आमदार थोरात यांनी आपले पद पणाला लावले आहे. तालुक्याचा विकास वेगाने होत आहे. महेंद्र गोडगे, डॉ.जयश्री थोरात, मिलिंद कानवडे, रमेश दिघे यांनीही मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केले.
संगमनेर तालुका दबावाला बळी पडणार नाही
संघर्ष हा संगमनेरकरांच्या नसात भिनलेला आहे. स्वातंत्र्य लढ्यातील संग्रामासह पाण्यासाठी मोठा संघर्ष आम्ही केला आहे. दबावाचे व खोट्या केसेस दाखल करण्याचे राजकारण संगमनेरकर कधीही खपवून घेणार नसून “सौ शहरी एक संगमनेरी’ असलेला हा तालुका दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नाही, असे आमदार थोरात यांनी सांगितले.