बाधितांनी दुसरा डोस कधी घ्यावा? : तज्ज्ञांनी दिली उत्तरे
पुणे – करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर करोनाचा संसर्ग झाला तर बहुतांश रुग्णांमध्ये धोका कमी असतो, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आह. मात्र, सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असणारे त्याला अपवाद असू शकतात. पहिला डोस घेऊनही जर करोनाची बाधा झाली असेल, आणि सौम्य लक्षणे असतील तर त्यांनी विलगीकरणाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पहिल्या सात ते दहा दिवसांत शरीरातील प्रतिकार शक्ती वाढून मोठ्या प्रमाणात ऍन्टिबॉडिज (प्रतिपिंडे) तयार होतात. अशा वेळी करोना विषाणूचा संसर्ग झाल्यास, त्याच्या लक्षणांचा कालावधी कमी होऊ शकतो. त्यातून सौम्य लक्षणे म्हणजे ताप, खोकला आदी लक्षणे लगेच जाणवू शकतात. अशा व्यक्तींनी सर्वसाधारण करोनाबाधितांप्रमाणेच सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने 14 किंवा 17 दिवसांच्या विलगीकरणात राहणे, योग्य औषधोपचार घेणे, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. हे करताना रोजच्या रोज जाणवणारी लक्षणे डॉक्टरांना सांगणे आणि त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर ऍन्टिबॉडिज तयार होण्यास किमान तीन ते चार आठवडे लागतात. त्यानंतर करोनाचा संसर्ग (ब्रेक थ्रू इन्फेक्शन) होण्याचे प्रमाण देशात नगण्य असल्याचे भारतीय आरोग्य संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) आकडेवारीनुसार दिसते. कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती आपल्याकडे आढळलेल्या करोना विषाणूच्या “डबल म्युटन्ट स्ट्रेन’लाही नियंत्रित करत असल्याचे आढळून आल्याचा दावाही काही अभ्यासकांनी केला आहे.
…म्हणून लसीकरण आवश्यकच
करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लस घेतल्यानंतरही कदाचित विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. पण त्याचे गंभीर परिणाम होणार नाहीत, तसेच मृत्यूदरही रोखता येऊ शकतो. अमेरिकेत लस घेतलेल्या लाखो व्यक्तींपैकी मोजक्याच व्यक्तींना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात जाण्याची गरज भासली.
पहिला डोसनंतर बाधित झाल्यास लसीचा दुसरा डोस कधी घ्यावा?
करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर बाधित झालेल्यांनी दुसरा डोस कधी घ्यावा, याविषयी मतमतांतरे आहेत. पहिला डोस घेतल्यावर संसर्ग झाल्यास चौदा दिवस विलगीकरण झाल्यानंतर आणि प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर चार आठवडे म्हणजेच सुमारे एक महिना थांबून दुसरा डोस घ्यावा असे सामान्यत: सांगितले जाते. परंतु काही तज्ज्ञांच्या मते करोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीमध्ये आधीच ऍन्टिबॉडिज तयार झालेल्या असतात. या शरीरात सुमारे तीन महिने तरी असतात. त्यामुळे लगेचच दुसरा डोस घेण्याची घाई करण्यापेक्षा तीन महिन्यानंतरच दुसरा डोस घेतला तर त्याचा परिणाम जास्त चांगला होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत.