नवी दिल्ली – हॉलिवूड सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर कंगना राणावतने लागलीच आपला मोर्चा रिहानाकडे वळवला. रिहानाचे ट्विटनंतर कंगनाने लांबलचक पोस्ट लिहित उत्तर दिले. या दोघांच्या वादात पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज उडी घेत रिहानासाठी एक गाणं तयार केलं. यामुळे भडकलेल्या कंगनाने दिलजीतला खलिस्तानी संबोधले. सध्या ट्विटरवर हा वाद सुरूच असतांना गाणकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
नेमक्या काय म्हणाल्या लता मंगेशकर
“एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा असो अथवा समस्या असो त्याचा एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे. आपल्या लोकांचं हित लक्षात घेऊन शांततापूर्ण पद्धतीनं तो मुद्दा सोडवण्यात आपण सक्षम आहोत, जय हिंद.”असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.