मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात अतिशय चांगले काम करुन एका महिलेने मतदारसंघ मजबूत केला, तो मतदारसंघ ताब्यात घेऊन चंद्रकांत पाटील यांनी तिथे निवडणूक लढवली. हा काही पुरुषार्थ आहे का ? असा सवाल विचारत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय. चंद्रकांत पाटील म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीकाही जयंत पाटलांनी केली आहे.
जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आता आपला पक्ष टिकवण्याची चिंता सतावत आहे. म्हणून ते वारेमाप बोलत सुटले आहेत. पुण्यात अतिशय चांगले काम करुन एका महिलेने मतदारसंघ मजबूत केला, तो मतदारसंघ ताब्यात घेऊन चंद्रकांत पाटील यांनी तिथे निवडणूक लढवली. हा काही पुरुषार्थ आहे का?
पक्षातील महिलेलाच बाजुला ढकलून त्या मतदारसंघावर अधिकार दाखवला. मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ जीवापाड जपला होता. पण आपल्या अधिकाराचा वापर करुन चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरातून निवडणूक न लढवता पुण्यात निवडणूक लढवली. म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असे चंद्रकांतदादा यांचे वर्तन राहिलेले आहे. त्यामुळे त्यांनी आदरणीय पवार साहेबांविषयी बोलण्याचे उद्योग बंद करावेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
तसेच आपण विरोधी पक्षात आहात, रितसर बोलायला आमची काही तक्रार नाही. पण चुकीचे बोलणाऱ्यांचे अप्रत्यक्ष समर्थन करणे बरोबर नाही, असा सल्लाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.