मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीसाठी साद घालत सकारात्मक संदेश दिला आहे. “मुंबई आणि मराठी माणसासाठी आपण एकत्र यायलाच हवं.” असं राऊतांनी ठामपणे सांगितलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे रक्ताच्या नात्याने जोडलेले भाऊ असून, महाराष्ट्राच्या हितासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सूचित केलं.
राज ठाकरेंच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद
नुकत्याच एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे वैयक्तिक भांडणं छोटी असून एकत्र येणं कठीण नसल्याचं म्हटलं होतं. याला प्रतिसाद देताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचं जाहीर केलं. आता संजय राऊत यांनीही युतीच्या शक्यतेवर सकारात्मक भाष्य करत, “आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आम्ही हवेत बोलत नाही. मराठी माणसावर कोणी हल्ला करत असेल, तर आम्ही साद देण्याची वाट पाहू,” असं सूचक वक्तव्य केलं.
अमित शहांना इशारा
संजय राऊत यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली. “अमित शहांनी शिवसेना फोडली, तिचे तुकडे केले आणि आता दुसरा पक्ष चालवत आहेत. हे विंचू आहेत, उद्या ते तुम्हालाही डंख मारतील,” असा थेट इशारा त्यांनी राज ठाकरे यांना दिला. महाराष्ट्राच्या मुळावर उठलेल्या शक्तींविरुद्ध एकजुटीने लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ठाकरे बंधूंची नाती आणि महाराष्ट्राचे हित
राऊत पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ आहेत. राजकीय मतभेद झाले असले, तरी दोघांचं नातं कायम आहे. उद्धव ठाकरेंचा मार्ग महाराष्ट्राच्या हिताचा आहे. राज ठाकरेंचं वक्तव्य आम्ही ऐकलं. महाराष्ट्राच्या हितासाठी वाद मिटवायला उद्धव ठाकरे तयार आहेत.” त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळीही उद्धव ठाकरे यांनी असाच संदेश दिल्याचं आठवण करून दिली.
महाराष्ट्राच्या शत्रूंविरुद्ध एकजूट
“महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या शक्तींना आम्ही थारा देणार नाही. जे महाराष्ट्राचे शत्रू, ते आमचेही शत्रू. अशी भूमिका घेणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू,” असं राऊतांनी ठणकावलं. त्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाचं आणि राज्याचं नुकसान करणाऱ्या शक्तींविरुद्ध एकजुटीने लढण्याचं आवाहन केलं. “आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहतोय. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सर्व शक्यता खुल्या ठेवू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या वक्तव्यातून संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युतीच्या शक्यतेचे दरवाजे उघडे ठेवले असून, आगामी काळात ठाकरे बंधूंची एकजूट महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहू शकते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा अनेकवेळा रंगल्या होत्या मात्र यावेळी शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये युतीची शक्यता बळावली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या दोन्ही पक्षात युती दिसू शकते.