मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे. यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
रोहित पवारांनी ट्विट करून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेवरून नाराजी व्यक्त केली. ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.
मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 25, 2021
रोहित पवार पुढं म्हणाले की, परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले, परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय. त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का,याचा विचार व्हावा.
दरम्यान पारदर्शकतेसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा. सध्या प्रत्येक पदासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी आकारली जाते, हे योग्य नाही. सरकारने यात लक्ष घालून परिक्षार्थींच्या हिताचा निर्णय घ्यावा, ही विनंती रोहित पवार यांनी केली.