पुणे – ऍलर्जीचा त्रास सगळ्यांनाच होतो, पण प्रत्यक्षात ऍलर्जीच्या कारणांचा शोध घेताना कुणी दिसत नाही. मात्र, भेसळीमुळे होणाऱ्या ऍलर्जीची कारणं इथे स्पष्ट करण्यात आली आहेत. कोणतंही खाण्यासाठी योग्य नसलेलं रसायन शरीरात गेलं की, शरीर ते स्वीकारत नाही. तर खाण्यायोग्य नसलेली सर्वात जास्त रसायनं ही साखर, तेल, तूप, आइस्क्रीम, बिस्किट्स, जॅम, जेली, ज्युस, लोणची, चटण्या या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून जातात. मग होते ऍलर्जी…
साखर :
साखरेत फॉर्मल्डीहाइड, सल्फर डायऑक्साइड, फॉस्फरस पेंटॉक्साइड नावाची रसायनं असतात. फॉर्मल्डीहाइड या रसायनामुळे दम्याची ऍलर्जी होते. बोलताना तसंच चालताना श्वास लागतो. विविध प्रकारच्या स्कीन ऍलर्जी येतात. म्हणजे त्वचा लाल होणं, त्वचा सुजणं, खाज सुटणं, शरीरावर पाण्याचे नाहीतर पुवाने भरलेले फोड येणं, बारीक पुरळ येणं. सल्फर डायऑक्साइडमुळेही विविध प्रकारच्या स्कीन ऍलर्जी येतात. म्हणजे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे येतात. फॉस्फरस पेंटॉक्साइडमुळे श्वास घ्यायला त्रास होण्यास सुरुवात होते. घशाच्या आतली त्वचा आहे ती लालसर होते. श्वासनलिका आकुंचित होते. श्वासनलिका आकुंचित झाली की, दम्याचा त्रास सुरू होतो. त्यामुळेच निसर्गोपचारात साखर बंद करायला सांगतात.
तूप, तेल :
तेल आणि तुपाचं शुद्धीकरण करताना विविध रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. सर्वात आधी तुपाचा रंग घालवण्यासाठी कॉस्टिक वॉश ही प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिडची प्रक्रिया केली जाते. त्या प्रक्रियेचं नाव आहे ऍसिडआर्थ ट्रीटमेंट. या ट्रीटमुळे कॉस्टिक सोड्याचा त्रास काही प्रमाणात कमी होतो, असं उत्पादकांना वाटतं. प्रत्यक्षात तो झालेला नसतो. त्यातून त्या हायड्रोजन गॅस पास करण्याकरता निकेल फॉरमेट नावाचं कॅटालिस्ट वापरतात. निकेल फॉरमेट हे कॅटालिस्ट कार्सिनोजीन आहे. कार्सिनोजीन म्हणजे कॅन्सर निर्माण करणारा पदार्थ.
हे तूप बाजारात हायड्रोजेनेटे व्हेजिटेबल ऑइल (एचव्हीओ), वनस्पती तूप, डालडा, उमदा, वनस्पती घी या नावाने ओळखलं जातं. या तुपापासून बिस्किटं, आइस्क्रीम हे पदार्थ तयार केले जातात. असे तूप खाल्ल्याने त्यातील कॉस्टिक सोड्यामुळे घशाची खवखव होते. घशाच्या आतल्या बाजूला सूज आल्यावर श्वासनलिकेचं आकुंचन होतं. श्वासनलिकेचं आकुंचन झाल्यावर दम्याचा अटॅक यायला सुरुवात होते. तर निकेल फॉरमेटमुळे कॅन्सरसारखा ऍलर्जीच्याही पुढचा आजार निर्माण होतो. त्यामुळे निसर्गोपचार काय सांगतं की, आइस्क्रीम-बिस्किट्स खा. पण घरी बनवलेले खा. बाजाराचे नको.
हल्ली बाजारात रिफाइंड तेल मिळतं. पण तेही शरीरास योग्य नाही. तेलाचं रिफायनिंग करताना रंग जाण्यासाठी कॉस्टिक सोड्याने धुतलं जातं. यात क्लोरोफिल, अँटोफिल यांसारखे तेल पचवणारे पदार्थ असतात. मात्र, कॉस्टिक सोड्याची ट्रीटमेंट देण्याच्या नादात लोरोफिल, अँटोफिल यांसारख्या पदार्थाचा परिणाम कमी केला जातो. परिणामी तेल पचत नाही. त्यानंतर ऍसिडआर्थ ट्रीटमेंट दिली जाते.
या ट्रीटमेंटमुळे तेल पाण्यासारखं दिसतं. प्रत्यक्षात ही जी ट्रीटमेंट दिली जाते ती तेल टिकण्याकरता दिली जाते. कारण तेल जास्त महिने टिकत नाही. या ट्रीटमेंटमुळे तेल जास्त महिने टिकतं. मात्र ते शरीरास उपयुक्त नाही. ऍसिडार्थ ट्रीटमेंटमध्ये वापरण्यात आलेलं हायड्रोक्लोरिक ऍसिड जर तेलात उरलं तर ते खवट बनतं. जर हायड्रोक्लारिक ऍसिड पुन्हा न्यूट्रलाइज्ड करण्याकरता तर प्रत्येक 100 लीटर तेलामध्ये 52 किलोग्रॅम परत कॉस्टिक सोडा टाकतात आणि एवढा कॉस्टिक सोडा टाकल्यावर हायड्रोक्लोरिक ऍसिडचा परिणाम नाहीसा होतो. असं तेल खाल्यावर गॅसेस निर्माण होतात. पचनाच्या समस्या निर्माण होतात. कारण जास्तीचा वापरेला कॉस्टिक सोडा हा त्रास देतोच ना.
व्हॅनिला :
कित्येकदा अन्नपदार्थात वापरण्यात येणाऱ्या फ्लेवर्समुळेही विविध प्रकारच्या ऍलर्जी येतात. कारण त्यात मूळ रंग नसतो. ओरिजन व्हॅनिला आहे तो महाग आहे. भारतीय चलनात व्हॅनिलाला प्रत्येक किलोमागे अडीत ते तीन लाख रुपये मोजावे लागतात. व्हॅनिलाच्या एका शेंगेची किंमत आहे दहा ते बारा रुपये. तर इतकं महागडं उत्पादन फारसं कोणाला परवडत नाही. त्यामुळे व्हॅनिलाप्रमाणे असणाऱ्या व्हॅनिलीन नावाच्या पदार्थाचा वापर केला जातो.
व्हॅनिलीन हा पदार्थ डांबरापासून (कोलचार) बनतो. डांबरापासून आधी पायप्रोनाल बनवलं जातं. पायप्रोनाल हे डोक्यातील उवा मारायचं औषधं आहे. पायप्रोनालपासून व्हॅनिलीन बनवतात. ज्याला व्हॅनिलासारखा वास येतो. अशा व्हॅनिलायुक्त पदार्थामुळे ल्युकेमिया किंवा ब्लड कॅन्सरसारखे आजार वाढतात. हा तर ऍलर्जीचा पुढचा प्रकार आहे. अननसाचा वास अननसापासून बनवता येईल. पण अननस महाग असल्यामुळे तो बनवता येत नाही. मग एथिल डयुटिरेट नावाच्या चामडं साफ कराव्या लागणाऱ्या पदार्थापासून अननसाचा वास बनवला जातो. यानेही त्वचेच्या समस्या होतात.
लोणची, सॉस, जॅम, जेली :
हे पदार्थ टिकण्यासाठी त्यात सोडियम बेन्झॉइट किंवा बेन्झोनाइट नावाचं प्रिझर्व्हेटिव्ह वारतात. सोडियम बेन्झोनाइट हे रसायन गजकरणाच्या मलमात वापरलं जातं. हे रसायन पोटात शरीराला आतून सूज येते. पोटाचे गॅसट्रायटिस, कोलायटिस, हॅपिटायटिस, पॅंक्रिआयटिस नावाचे पोट, आतडी, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय या अवयवांना सूज येणारे आजार निर्माण होतात. सर्वसामान्य लोकांना हे माहीत नसते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा आता पदार्थ घरीच करून खा. नाहीतर ऍलर्जी होईल.
-डॉ. शितल जोशी