नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत तब्बल नऊ वेळा चीनला भेट दिली आहे. मात्र त्यानंतरही चीनने भारताचा भूभाग बळकावला. त्यामुळे मोदी यांच्या इतक्या चीन भेटींचा फायदा काय झाला, याचे त्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी ट्वीटरवर केली आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे अन्य नेते दिग्विजय सिंह यांनीही ते रीट्वीट केले असून त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पाच वेळा तर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून चार वेळा चीनला भेट दिली आहे. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या कारकीर्दीत चीनला केवळ एकदाच भेट दिली होती. चार पंतप्रधानांनी तर एकदाही चीनचा दौरा केला नाही.
याउलट मोदींनी नऊ वेळा भेट दिली आहे, याकडे पटेल यांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पंडित नेहरू, राजीव गांधी, नरसिंह राव, देवेगौडा, अटलबिहारी वाजपेयी यांनी एक वेळा तर मनमोहन सिंग यांनी दोन वेळा चीनला भेट दिली.
इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल यांनी तर एकदाही चीनला भेट दिलेली नाही. त्यामुळे आता पंतप्रधानांच्या आताच्या या भेटींचा विचार केला जावा आणि त्याचा उद्देश काय होता, असा सवाल केला आहे. दरम्यान, दिग्विजय सिंह यांनीही हाच मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.
कालच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याच विषयावरून सरकारला लक्ष्य केले होते. दरम्यान, कॉंग्रेस नेत्यांच्या या ट्वीटवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. काही लोकांनी त्याचे समर्थन केले आहे, तर काहींनी टीका केली आहे.