करोना विषाणूंच्या प्रादुर्भावात सारे विश्व भरडले गेल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. बलाढ्य देश या विषाणुपुढे हतबल आहेत. लाखोंच्या संख्येने लोक मरण पावले. हे सर्व होत असताना दुसरीकडे बरेच दिवस लॉकडाऊन असल्याने जगभरातील माणसांना आपल्या महत्त्वाचा गरजा कोणत्या? त्या किती? आपण वायफळ खर्च किती करतो आहोत, याची जाणीव झाली असेल.
जे कुटुंब एकमेकांपासून दुरावलेले होते ते या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये कैटुंबिक आनंद, प्रेम निर्माण होऊन नाते दृढ होण्यासाठी मदत झाली. कंपन्या, कारखाने तसेच वाहतूक बंद असल्याने निसर्ग प्रदुषणातून मोकळा श्वास घेत आहे. प्रदूषण किती तरी पटीने कमी झाले आहे, हे लॉकडाऊन फक्त प्रदूषण कमी करण्यासाठी केले असते, तर जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला असता की नाही यामध्ये साशंकता आहे.
कार्बनडायऑक्साईडची पातळी कमी झाल्याने ओझोन वायूवर चांगला परिणाम झाला. वातावरण स्वच्छ झाल्याने ऑक्सिजनची पातळी वाढली. त्याचा सजीव सृष्टीसाठी चांगला फायदा झाला. नद्या शुद्धीकरण प्रकल्प शासनाचा खर्च वाचून आपोआप नद्या, नाले, ओढे स्वच्छ झाले. करोना निसर्गासाठी वरदान ठरला आहे का? हा विषय चर्चेचा ठरू शकतो.
भानुदास बलभीम शिंदे टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर संपर्क : 9921878247