एमएस हे केंद्रीय मज्जासंस्था (प्रामुख्याने मेंदू आणि मज्जारज्जू)वर परिणाम करते. ज्यामुळे नर्वचे (मज्जातंतू) नुकसान होते. तरुणांमध्ये एमएस अधिक प्रचलित आहे. म्हणून वय जितके अधिक आहे तितका प्रभाव अधिक; परंतु हे खरे आहे की, मुलांपेक्षा मुलींना जास्त त्रास होतो. एमएस हे त्यांच्या शरीराच्या महत्त्वपूर्ण भागांच्या कार्यप्रणालीवर परिणाम करते. या लक्षणांमध्ये अस्पष्ट दृष्टी, लघवीची अडचण आणि समतोल राखण्यात अडचण. या आधुनिक जगात उपचार पर्यायांची उपलब्धता आणि लवकर निदानांची जागरूकता आवश्यक आहे. प्रारंभिक निदान, नवीन औषधे आणि उपचार या पर्यायांची उपलब्धता एमएस रुग्णांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते.
भारतामध्ये सध्या एमएसचे प्रमाण एक हजार लोकांमध्ये 80-90 असे असावे, असा अंदाज आहे. ही आकडेवारीसुद्धा अपूर्ण आहे. कारण, ग्रामीण भागामध्ये या रोगाचा कितपत प्रादुर्भाव आहे याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, न्यूरोलॉजिस्टमध्ये या व्याधीविषयीची जागरूकता वाढल्याने तसेच एमआरआय तपासण्यांची सोय उपलब्ध असल्याने गेल्या काही वर्षामध्ये अशा रुग्णांची अधिक संख्येने नोंद होऊ लागली आहे. एमएसची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.
एक आनुवांशिक आणि दुसरे पर्यावरणीय. गेल्या काही काळामध्ये एमएसची लागण होण्याचा वयोगट 35-40 वर्षांचा राहिला असून, स्त्री-पुरुषांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढते आहे. या व्याधीच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतीयांना तिचे गांभीर्य कळून आले असून, ही स्थिती व त्यातून उद्भवणारे अपंगत्व यांचा अधिक साकल्याने विचार केला जाऊ लागला आहे.
एमएस व्याधीच्या रुग्णांचे आयुष्य अडथळ्यांनी भरलेले असते. पुढे काय घडणार याची कल्पनाही त्यांना नसते. या व्याधीची लक्षणे अदृश्य असल्याने कामाच्या ठिकाणी, कुटुंबात आणि सामाजिक पातळीवर त्यांना असमानतेची वागणूक दिली जाते.
समाजाकडून होणाऱ्या हेटाळणीला तोंड देण्यासाठी अशा रुग्णांना समुपदेशन पुरवणे गरजेचे आहे.
खरेतर या व्याधीला अपंगत्व कायद्यामध्ये स्थान मिळाले आहे. तरीही अदृश्य लक्षणामुळे त्यांचा शारीरिक स्थितीचा योग्य प्रकारे स्वीकार होण्यामध्ये अडथळे येतात. एमएसची तीव्रता मोजताना केवळ अपंगत्वाची टक्केवारी मोजणे हा एकमेव निकष ग्राह्य धरता येणार नाही. कारण हे रुग्ण अकल्पित लक्षणांना सामोरे जात असतात.
– श्रुती कुलकर्णी