मुंबई – चीन आणि पाकिस्तानने भारताच्या बाबतीत सध्या अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन भारतावर कुरघोड्या सुरू केल्या असताना त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत नेमका काय करतोय असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. भारताकडून त्यांना कठोर प्रतिसाद दिला गेला नाही तर चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन भारताच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न करतील असे शिवसेनेने म्हटले आहे. यात त्यांनी भाजपचे नाव घेऊन टीका केलेली नसली तरी त्यांचा उल्लेख राजकीय ईस्ट इंडिया कंपनी असा केला आहे.
पाकिस्तानकडून काश्मीरात इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले असा सवालही सेनेने केला आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून पाकिस्तान जास्तच शिरजोर झाला आहे. सध्या काश्मीरातून हिंदुंचे स्थलांतर सुरू आहे, ही गोष्ट हिंदुत्वाची गाजराची पुंगी वाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला शोभणारी नाही.
दहशतवादाच्या भयाने लोक आपली घरेदारे संपत्ती सोडून पलायन करीत आहेत या लोकांचे दु:ख पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी लक्षात घेतले पाहिजे. निरपराध हिंदुंना आणि कर्तव्यदक्ष मुस्लिम अधिकाऱ्यांना मारले जात आहे. त्यांचा बदला घेतला नाही तर त्यांनी सांडलेले रक्त आणि अश्रु वाया गेले असे होईल. तिकडे पुर्व लडाख मध्ये चीनचे लष्कर घुसले आहे.
हे सैन्य माघार घेण्यास ते तयार नाहीत. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या तेरा फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. उत्तराखंड मधील बाराहोती आणि अरूणाचल प्रदेश मधील तवांग मध्ये चीनने थेट घुसखोरी केली आहे.
त्यांनी अत्यंत आक्रमक धोरण स्वीकारून भारतापुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून निर्माण झालेल्या आव्हानाला भारताकडून ठोस प्रत्युत्तर मिळणे गरजेचे आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे.