आयुष्यात कितीही काटे असले तरी ते बाजूला करायचे आणि चालत रहायचे अव्याहतपणे; शिवाय चालताना कुणी गरजू दिसला की त्याला मदत करायचीच मनापासून; अशा पद्धतीने आयुष्यात मार्गक्रमण करणारी माणसेच विरळा! वीणा आणि आनंद मोकाशी त्यांचा परिवार म्हणजे ‘विश्वची माझे घर’! एखाद्या गरजू मुलाची सोय करायची आहे, असे कानावर पडले की, लगेच मोकाशी कुटुंब त्या मुलापर्यंत जाऊन येणार, खरे-खोटे पडताळून बघणार आणि लगेच त्याचा, महिन्याचा पहिला खर्च स्वतःकडून करणार. नंतर त्या मुलासाठी बाकीच्यांनीही खर्च करावा यासाठी शिस्तीत दोन तास फोनवर लोकांशी संपर्क साधून त्या मुलाची गरज पूर्ण करण्यास लोकांना प्रोत्साहित करणार.
वीणाकाकू म्हणजे म्हणजे चालते बोलते सेवा केंद्र! त्या सहकारनगरमध्ये राहतात. गेल्या वर्षीचा पावसाचा धुमाकूळ आठवतोय? आंबील ओढ्याच्या पुराने जे थैमान घातले होते, त्या परिस्थितीत लोकांना सावरण्यासाठी वीणा काकू बाहेर पडायच्या. कुणाला काय हवे, नको हे जातीने बघून त्या घरी काकांना सांगायच्या आणि मग काका त्या सगळ्या वस्तू हितचिंतकांकडून गोळा करून गरजुंना नेऊन द्यायच्या.
असेच पुराच्या फटक्यात माझ्या सेंटरला आल्यावर माझी त्यांची ओळख नसतांनाही फक्त दिव्यांग मुलांचे सेंटरच्या ऐकीव माहितीच्या भरवशावर त्या माझ्यापर्यंत आल्या आणि एकूण झालेली नासधूस बघून त्या गळ्यात पडून रडायलाच लागल्या. तशाच घरी गेल्या. अर्ध्या तासाने काका गाडी घेऊन आले. येताना काही भांडी, स्टाफला खायला पोहे आणि चहा पाठवला होता.
सध्याच्या या लॉकडाउन च्या काळात एका बाईंच्या मदतीसाठी मी फोन केला तर काका म्हणाले, “काकू , ताईंना डबा घेऊन गेल्यात, शेजारच्या अण्णांना आणि वॉचमनलाही डबा देऊन येणार आहे. मग ती आली की, मी वॉचमनला चहा द्यायला जाईन आणि येताना सरूकाकुंची भाजीही देऊन येईन.
बापरे! प्रसंग कोणताही असो दोघे कायम लोकांच्या सेवेसाठी तैनात असतात. पण हे दोघे कुठेही एकत्र जाऊन काम करत नाही. याचे मला कायमच आश्चर्य वाटायचे. न राहवून विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘अगं, गौरव असतो ना घरी, म्हणून दोघांना एकत्र बाहेर पडताच येत नाही.’
“गौरव कोण?’ “अगं, चांगला 39 वर्षांचा आहे गौरव. तो दिव्यांग म्हणजे स्वमग्न आहे. त्याच्याजवळ कुणाला तरी सतत रहावे लावते. आम्ही त्याला एकटा सोडून काहीच करू शकत नाही.’बापरे! माझ्या अंगावर काटा आला.
39 वर्षांचा मुलगा, तोही दिव्यांग, जो दिवसभर आई बाबांना सटासट मारत असतो, बोचकारतो अशा मुलाला सांभाळतानासुद्धा यांची तक्रार नाही, कुरकूर नाही आणि हसत सगळा दिनक्रम पार पाडताना यांची दमछाक होत नाही, याचे मला अप्रुपच वाटले.
साधारण 39 वर्षांपूर्वी मोकाशी दाम्पत्याना जुळी मुले झाली; एक मुलगा आणि एक मुलगी. पण अवघ्या सहा महिन्यात आपले एक मूल वेगळे आहे हे त्यांच्या लक्षात आले. अखेर पुण्याच्या दिव्यांग शाळेत त्याला घालायचे ठरले आणि त्या पुण्यात स्थायिक झाल्या.
वीणाकाकूंचे सासरे नेहमी म्हणायचे, “कंटाळू नकोस, ही मुले देवात जमा आहेत.’ रोज रोज हे ऐकून खरंच विणा काकूंमध्येच देवपण झळकत गेले. वीणा काकू आणि आंनद काकांनी या मुलांच्या पालकांची दुःखे गौरवच्या माध्यमातून जवळून पहिली होती; त्यामुळे याची जाणीव म्हणून त्यांनी लोकांसाठी जगण्याचा विडाच उचलला. गौरवला सांभाळणे हा मोठा टास्क आहे, कारण गौरव बोलू शकत नाही, सगळ्याच गोष्टी त्याला कळतील असे नाही. तरी दोघेही गौरवला सगळीकडे आनंदाने नेतात. त्यांना गौरवची कधीच अडचण वाटली नाही. त्याहीपेक्षा स्वत:ला त्यांनी गौरव ही अडचण आहे, हेच मुळी कधी समजलं नाही. गौरवला घेऊन त्यांनी संपूर्ण भारत पालथा घातला आहे; परदेशवारीही त्याला घडवून आणली आहे.
शिवाय वीणाकाकू चित्रकला, भरतकाम, विणकाम, पाककला या सगळ्या कला जोपासतात आणि काका साहिर लुधीयानवी यांच्या शायरी आणि गाण्याच्या रसस्वादाचे विनामूल्य कार्यक्रम करतात. आतापर्यंत त्यांचे 25 कार्यक्रम झाले आहे आणि सलग 11 तास केलेल्या कार्यक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. तर मुलगी गायत्री बेल्जियमला आहे.
आपल्या दिव्यांग मुलांसह कित्येक दिव्यांग मुलांच्या घरचे हे दोघे आधार आहे. गेल्या वर्षी वीणाकाकूंना ‘सिंधुताई जोशी आदर्श माता पुरस्कार’ मिळाला. ही खरी त्यांच्या कामाची पावती. दिव्यांग आणि अव्यंगाचे लग्न लावून देणे, हा त्यांचा आणखी एक कळकळीचा विषय. आतापर्यंत अशी 19 लग्ने त्यांनी लावली आहे आणि एका अंध मुलीचे कन्यादान करण्याचा त्यांचा मानस आहे.
अनेक गरजू संस्थांचे पत्ते या दोघांकडे आहे. रोज प्रत्येक संस्थेला फोन करून त्यांची गरज विचारणे आणि त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी समाजाला आवाहन करणे, त्यांच्यापर्यंत ती वस्तू पोहोचवणे, हे अतिशय नित्याचे काम या दोघांनी स्वतःसाठी योजून ठेवले आहे. ‘वाहून घेणे’ म्हणजे काय असते? हे यांच्याकडे पाहून कळते आणि त्यांचे काम महिती असणाऱ्या प्रत्येकाची मान त्यांच्यापुढे नतमस्तक होते.आपण इतकंच करू शकतो त्यांच्यासमोर; कारण त्यांची उंची गाठणेच कठीण!
-डॉ. प्राजक्ता कोळपकर