भोपाळ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची यादी आम्ही तयार करीत आहोत असे विधान कॉंग्रेस नेते कांतीलाल भुरीया यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसवाले संघाचे काय नुकसान करणार? बरेच लोक आले आणि गेले… कॉंग्रेसच्या लोकांना नैराश्य आले आहे. आरएसएस ही देशभक्तांची संघटना आहे. लाखो स्वयंसेवक देशासाठी जगायला आणि मरायला तयार आहेत. तुम्ही कॉंग्रेसवाले संघाचे काय नुकसान करू शकणार आहात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कॉंग्रेसचे लोक संघाशी संबंधीत सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना संपवण्याच्या धमक्या देत आहेत. जनताही अशा धमक्या देणाऱ्या लोकांना संपवणार आहे असा इशाराही चौहान यांनी दिला आहे.
कांतीलाल भुरीया यांनी म्हटले होते की, भाजप नेत्यांच्या सल्ल्याशिवाय काम करायला तयार नसलेल्या सरकारी अधिकाऱ्यांमुळेही लोक संतापले आहेत. ते गरिबांची कामे करत नाहीत. भाजपच्या एखाद्या नेत्याने कामासंदर्भात फोन केल्यास तुमचे काम होईल, असे ते म्हणतात. हा प्रकार आणि अधिकाऱ्यांमध्ये निर्माण होत असलेली मानसिकता योग्य नाही, असे ते म्हणाले.
Jammu and Kashmir : भारत जोडो यात्रेत ‘उर्मिला मातोंडकरांचा’ही सहभाग
भुरीया यांनी म्हटले होते की, अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर तयार केली जात आहे, जी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांना दिली जाईल.