मुंबई – “कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे…’ असं म्हणत गेली अनेक वर्षे झी मराठी वाहिनीवरील “चला हवा येऊ द्या..! हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
या कार्यक्रमातील कलाकार मंचावर एक-सो-एक अनेक नवीन पात्र साकारत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम सतत चर्चेत असतो. मात्र, सध्या “चला हवा येऊ द्या..! ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच, या मालिकेत केंद्रीय मंत्री ‘नारायण राणे’ यांचे पात्र हुबेहूब दाखवण्यात आले होते. मात्र, या पात्रावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदविला. अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या.
परिणामी राणे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि निलेश साबळे यांना फोन करून संताप व्यक्त केला होता. “चला हवा येऊ द्या..! या मालिकेचे सूत्रसंचालन निलेश साबळे करत आहे.
या संपूर्ण प्रकरणावरून हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे आणि संपूर्ण टीमने नारायण राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. या भेटी दरम्यान आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.