मुंबई : मागील काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणात अनके बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी ‘मातोश्री’वर पोहचले होते. अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीअसून या भेटीच नेमके कारण समजू शकले नाही.
शुक्रवारी एकीकडे मनसेच्या वतीने शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. तर दुसरीकडे त्याचवेळी रात्री ८.२० च्या सुमारास अनंत अंबानी ‘मातोश्री’वर दाखल झाले होते. त्यानंतर ११.३० च्या सुमारास ते तेथून बाहेर पडले. अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल तीन तास चर्चां झाली आहे. या भेट दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्याने राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राज्यात सत्तातर झाल्यावर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु असून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आहे.