नवी दिल्ली -आत्मनिर्भर भारत धोरणाचा नेमका अर्थ काय हे आपल्याला अद्याप स्पष्ट झाले नाही, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.
आत्मनिर्भर भारत म्हणजे उत्पादन वाढविणे असेल तर भारतात अगोदरच मेक इन इंडिया हे धोरण चालू आहे. मेक इन इंडियाचे रिब्रॅंर्डिंग म्हणजे आत्मनिर्भर भारत हे धोरण आहे का, असे ते म्हणाले.
जर आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबन म्हणजे बचावात्मकता असेल तर असे करणे चुकीचे ठरेल. कारण अगोदर अशा प्रकारचे बचावात्मक धोरण अयशस्वी झाले आहे. त्यामुळे दारिद्य्र वाढण्याबरोबरच अनेक प्रश्न निर्माण झाल्यामुळे भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले आहे. आता आत्मनिर्भर भारत म्हणजे अशा प्रकारचे बचावात्मक धोरण असेल तर त्यामुळे भारताचे नुकसान होईल, असे राजन म्हणाले.
पायाभूत सुविधांवर भर हवा
भारत जागतिक उत्पादन केंद्र व्हायचे असेल तर आयातीवरील निर्बंध काढून टाकण्याबरोबरच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याची गरज आहे. त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य विकास केला तर उत्पादनासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल, असे ते म्हणाले.