मुंबई – राज्यात सध्या पोटनिवडणुकांचे वारे वाहत असताना पुन्हा एकदा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या शपथ विधीची चर्चा जोर धरू लागलेली आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा यावर मतमतांतरे सुरु झाली आहेत. अशात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. फडणवीस त्यांच्या केल्या काही काळातील भूमिका सांगत फडणवीस एवढे दुटप्पी कसे वागू शकतात असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
त्या दिवशी काय घडलं हे अजितदादा आणि पवार साहेब सांगू शकतात असं स्पष्ट मत रोहीत पवार यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिला. फडणवीस साहेबांच्या अनुभवाचा मी आदर करतो,ते मोठे नेते आहेत. परंतु निवडणुकीपूर्वी ते म्हणाले होते काहीही झालं तरी राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही.. जाणार नाही मात्र नंतर ते सबत गेले. त्यानंतर सेना फुटली तेव्हा ते म्हणाले यामध्ये आमचा हात नाही मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत सांगितलं सेना फोडण्यामागचे कलाकार कोण आहेत. अशी दुटप्पी भूमिका एवढ्या मोठ्या नेत्याकडून कशी काय येते याच माझ्यासारख्याला आश्चर्य वाटत असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत त्या पहाटेच्या शपथविविधीबाबत पुन्हा भाष्य केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्या दिवसाबद्दल चर्चा सुरु झाल्या. त्याबाबत रोहित पवार बोलत होते. अशी वक्तव्य करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय का ? असा संशय देखील यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.