मुंबई – दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुमारे 40 ते 50 जणांच्या घोळक्याने शिक्षक व विद्यार्थ्यांवर रात्री जबर हल्ला चढवला होता. यामध्ये जवळपास 30 विद्यार्थी 12 शिक्षक गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटले. जेएनयूमधील हल्ल्याचे वृत्त समजताच मोठ्या संख्येने विद्यार्थी ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या परिसरात जमले आणि रात्रभर या ठिकाणी धरणे दिले. यावेळी एका विद्यर्थिनीने फ्री काश्मीरचे पोस्टर झळकवल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. या पोस्टरवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
याबद्दल आता पोस्टर झळकवणाऱ्या मुलीनेच स्पष्टीकरण दिले आहे. महेक मिर्झा असे त्या मुलीचे नाव असून इंस्टाग्राम पोस्टवरून तिने स्पष्टीकरण दिले आहे. महेक म्हणाली कि, भारतापासून काश्मीर स्वतंत्र कऱण्यासाठी नाही तर तिथल्या लोकांनाही इतर भारतीय नागरिकांप्रमाणे स्वातंत्र्य मिळावं म्हणून हा फलक झळकावला. मी कोणत्याही गॅंगचा हिस्सा नसून मुंबईतच राहते.
तिने पुढे म्हंटले कि, काश्मीरमधून मानवता हरवली आहे. आपण येथे राहून तिथल्या अडचणी, समस्या समजून घेऊ शकत नाही. आपण जसे स्वतंत्र आहोत तसंच स्वातंत्र्य काश्मीरमधील लोकांनाही मिळायला पाहिजे. काश्मीरी लोकांच्या पाठिमागे आपण उभा राहिलं पाहिजे. गेल्या १५० दिवसांपासून तिथले सर्व व्यवहार ठप्प आहेत. आपण असे दिवस काढू शकणार नाही. आपल्या या लढ्यात काश्मिरी नागरिकांना सोबत ठेवून त्यांनाही स्वातंत्र्य मिळावं एवढीच माझी मागणी आहे, असे स्पष्टीकरण महेकने दिले.
दरम्यान, ऑक्युपाय गेटवे या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लोंढे गेटवेकडे वळू लागले. पोलिसांनी आंदोलकांना ‘गेट वे ऑफ इंडिया’ या परिसरातून स्थलांतरीत करण्यात आले असून त्यांची रवानगी ‘आझाद मैदाना’त करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.