मुंबई : करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली. त्यामुळे करोना निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले. तर काही जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यातच मुंबईतील लोक सुरू करण्यासंदर्भातही राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र विरोधकांकडून आता मंदिरं सुरू करण्यासाठी आंदोलनं करण्यात येत आहेत. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनाचे कान उपटले आहेत.
करोनाची लाट ओसरल्यानंतर विरोधकांनी आंदोलने सुरू केली आहेत. अमूक सुरू करा, तमूक सुरू करा, असं सांगत आहेत. अरे आंदोलने कसली करताय? करोना काही सरकारमान्य कार्यक्रम नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याच्या प्लांटचे लोकार्पण झाले उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
राज्यात काही जणांचं राजकारण सुरू आहे. लाट ओसरण्यासाठी किती कष्ट करावे लागले याची कोणाला जाण नाही, भान नाही. पण लाट ओसरल्यानंतर अमूक करा नाही तर आम्ही आंदोलन करू, तमूक करा नाही तर आंदोलन करू, असे इशारे दिले जात आहेत. अरे आंदोलन कसली करताय? करोना हा काय सरकार मान्य कार्यक्रम नाही. हा काही मोफत करोना वाटपाचा कार्यक्रम नाही. आंदोलन करायचे असेल तर जास्तीत जास्त ऑक्सिजन प्लांट लावण्याचं आंदोलन करा ना, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले.