सातारा (प्रशांत जाधव) : आजवर अनेकदा पोलिसांनी पैसे घेतल्याचे आपण ऐकले असेल पण सध्या सातारा जिल्हा पोलीस दलात काम करणाऱ्या पोलिसांनाच गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. थेट पोलीस ठाण्यात फोन करून बदलीसाठी इच्छुकांची यादी मागवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे पोलीस दलातील वरिष्ठांची झोप उडाली असून कर्मचाऱ्यांच्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित भामट्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर ठाकले आहे.
त्याचे झाले असे की, प्रत्येक वर्षाचा मे महिना म्हणजे पोलीस दादांच्या बदल्यांचा महिना मानला जातो. मात्र, यंदा करोनामुळे राज्य शासनाकडून बदल्या न करण्याबाबतचा आदेश निघाला अन् अनेकांच्या चेहर्यावर नाराजी दिसून आली. नेमका याचाच फायदा घेत, या सगळ्या गोष्टींची माहिती असलेल्या एका भामट्याने पोलीसांना बदल्यांचे गाजर दाखवून खिसा गरम करण्याचा बेत आखला. दि. 17 जून रोजी सकाळी वाई पोलीस ठाण्याचा फोन खणाणला तो फोन एका सहाय्यक फौजदार असलेल्या अधिकार्याने उचलला होता.
त्यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्याकडील विनंती बदलीसाठी इच्छूक लोकांची यादी कोणाकडून मिळेल असे विचारले विचारल्याने त्या सहाय्यक फौजदाराने आपण कोण बोलत आहात असे विचाल्यावर त्याने मी पोलीस निरीक्षक पाटील बोलत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला वाई पोलीस ठाण्याच्या हजेरी मेजरचा मोबाइल नंबर देण्यात आला. त्यानंतर त्या व्यक्तीने हजेरी मेजरला फोन करून पून्हा तीच माहिती विचारून फोन ठेवला.
हजेरी मेजरला शंका आल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना घटना सांगितल्यावर खोबरे यांनी संबंधिताला त्याच्या मोबाइलवर फोन करून त्याचे पद व नेमणूक याबाबत विचारणा केली. तेव्हा आपलं पितळ उघडं पडण्याच्या भितीने संबंधिताने मी पुण्याला असतो असे सांगून फोन ठेवून दिला होता. याप्रकरणी वाईचे हजेरी मेजर असलेले सुनिल वाघमळे यांनी वाई पोलीस ठाण्यात संबंधित भामट्याविरोधात फिर्याद दिली आहे.
तर दुसरा प्रकारही असाच पाचगणी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अरविंद माने व पोलीस नाईक जगताप यांच्यासोबत घडला आहे. त्यांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना शाखेतून पाटील बोलत असल्याचे सांगून संबंधिताने माने यांना सात व जगताप यांना पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात असला प्रकार पहिल्यांदाच झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने सर्व डीवायएसपींना त्यांच्या उपविभागात असे फोन कोणाला आलेत का याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पण हा प्रकार केवळ चौकशी करून संपवण्यासारखे नाही कारण जिल्हा पोलीस दलाला बट्टा लाबण्याचे पाप संबंधित भामट्याने केल्याने तो नेमका कोण आहे, कोणाच्या जवळचा आहे, कोणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले आहे या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास करून त्याचा बंदोबस्त करायलाच हवा पण जर पोलीस दलातील कोणाचा त्याच्या डोक्यावर हात असेल तर त्यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. अर्थात तो कितीही जवळचा अथवा लांबचा असला तरी.
हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधणे गरजेचे
संबधिताने ज्या पध्दतीने पोलीस ठाण्याच्या फोनवरून माहिती गोळा करण्याचे धाडस केले आहे. तसेच हजेरी मेजरकडून माहिती मिळवून कर्मचाऱ्यांना फोन करण्याचा उद्योग केल्याने त्या भामट्याचा पोलीस दलातील हायरिस्क कॉन्टॅक्ट तर नाहीत ना हे शोधणे गरजेचे आहे. असे झाले तरच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचे धाडस यापुढे कोणी करणार नाही.